Site icon Jan Bharat Samachar

आळंदी नगरपरिषद गणेश विसर्जन कृत्रिम तलाव उपक्रमास प्रतिसाद

Spread the love

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील आळंदी नगरपरिषदेच्या वतीने इंद्रायणी नदीकाठी ६ ठिकाणी कृत्रिम विसर्जन तलाव केंद्रे उभारण्यात आली होती. या उपक्रमात गणेश भक्तांनी उत्साहात सहभागी होत या केंद्रांमध्ये ७ हजार ५११ गणरायांचे विसर्जन करून नदी स्वच्छतेचा संकल्प जपत मूर्तीदान केले. या मूर्ती दान उपक्रमास परिसरातुन मोठा प्रतिसाद मिळाला.
या उपक्रमात आळंदी नगर परिषदेने अधिकारी व कर्मचारी असे ८० सेवक कार्यरत राहिले. आळंदी ग्रामस्थ, वारकरी, भाविक, गणेश मांडले यांनी यास उत्स्फूर्त प्रतिसाद देत नदी प्रदूषण मुक्त रहावी यासाठी सक्रिय सहभाग घेत प्रतिसाद दिल्याचे मुख्याधिकारी माधवराव खांडेकर यांनी सांगितले.
गणेश विसर्जन कालावधीत आळंदी नगरपरिषदेच्या वतीने निर्माल्य संकलन केंद्रे विकसित करण्यात आली होती. या केंद्रांतुन सुमारे ४ टन निर्माल्य नदीत जाण्यापासून नदी बाहेरच रोखण्यात आले. त्या पासून सेंद्रिय खत निर्मिती करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी खांडेकर यांनी सांगितले. आळंदीत नदी घाट परिसरात संकलित झालेल्या मूर्ती श्री बालाजी फाउंडेशन, बालेवाडी यांच्या मार्फत शास्त्रोक्त पद्धतीने विरघळवून त्यापासून विविध कलाकृती तयार करण्यात येणार आहेत. तसेच निर्माण झालेली माती झाडांसाठी उपयुक्त ठरणार असल्याने वृक्ष संवर्धन उपक्रमात वापरली जाणार आहे. या केंद्रांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. इंद्रायणी नदी स्वच्छ ठेवण्याच्या प्रयत्नांना हातभार यामुळे लागला. उपक्रमात दोन दिवस एमआयटी महाविद्यालयाचे NSS विभागातील ७० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतल्याचे त्यांनी सांगितले. आळंदी शहर शिवसेनेचे शहर प्रमुख राहुल चव्हाण यांचे वतीने ठिकाणी श्रींचे मूर्ती विसर्जन कुंड ठेवत मूर्तीदान स्वीकारत नगरपरिषदेकडे मूर्ती सुपूर्द करण्यात आल्याचे उपशहर प्रमुख माउली घुंडरे पाटील, शाखा प्रमुख रोहिदास कदम यांनी सांगितले. सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम राबविण्यात आल्याचे राहुल चव्हाण यांनी सांगितले.

Exit mobile version