Site icon Jan Bharat Samachar

बीड मधील शेतमजुरांसाठी हवा मदतीचा हात

Spread the love

मराठवाड्यातील अनेक गावांना महापुराचा जोरदार फटका बसला. यामुळे आपला अन्नदाता बळीराजा याचे अवघे विश्व वाहून गेले. या शेतकऱ्यांचे अश्रू पुसून त्यांना भावनिक आणि मानसिक आधार देण्यासाठी पुण्यातील भोई प्रतिष्ठानच्या मदत पथकाने बीड जिल्ह्यातील राजेगाव, भगवान नगर, गव्हणथडी, कवडगाव थडी, शेळगाव थडी, रीदोरी, काळेगाव थडी , महातपुरी, सुलतानपूर, पुरुषोत्तम पुरी, हिवरा या गावांमध्ये वास्तव्य केले. प्रत्यक्ष त्यांच्यासोबत राहून तेथील परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर ज्या गोष्टी जाणवल्या त्या पुढील प्रमाणे आहेत.
-गोदावरी नदीच्या रौद्ररूपाने शेतीतील पिके, घरातील सर्व साहित्य ,गुरे या सर्व गोष्टी वाहून गेल्या आहेत.
– लोकांनी आजूबाजूच्या गावातील शाळांमध्ये आणि समाज मंदिरात तात्पुरता आसरा घेतला आहे.
– या शेवटच्या घटकापर्यंत पोचणारी मदत अत्यंत तोकडी आहे आणि त्याच्यामध्ये खूप त्रुटी आहेत.
भोई प्रतिष्ठान आणि सेवा मित्र मंडळ यांच्या माध्यमातून या बांधवांसाठी खालील प्रकारे मदत गोळा करण्यात येत आहे. ती मदत घेऊन जाणारी पहिली टीम आज सायंकाळी सात वाजता बीडमध्ये रवाना होणार आहे. पुणेकरांनी या शेतमजुरांचे अश्रू पुसण्यासाठी पोचण्यासाठी सहभागी व्हावे असे आवाहन भोई प्रतिष्ठान व सेवा मित्र मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या बांधवांना आपण खालील प्रमाणे मदत करू शकता.
– या शेतमजुरांची आणि शेतकरी बांधवांची अक्षरशः उपासमार होत असल्याने त्वरित त्यांना साधारणपणे महिनाभर पुढे एवढे किराणा साहित्य – एका कीट ची किंमत बाराशे रुपये.
-अनेक विद्यार्थ्यांचे शालेय साहित्य, दप्तर, पुस्तके ,कागदपत्रे हे सर्व वाहून गेले आहे त्यामुळे इच्छा असून सुद्धा ही मुले शाळेत जाऊ शकत नाहीत.
मुलांचे शैक्षणिक साहित्य -यामध्ये सॅक, वह्या ,पुस्तके, डबा याचा समावेश. एका कीट ची किंमत पाचशे रुपये.
-पुराचे पाणी हळूहळू ओसरत आहे. साधारणपणे चार ते पाच दिवसानंतर हे शेतकरी त्यांच्या झोपड्यांमध्ये आणि घरांमध्ये परतणार आहेत. त्यावेळेस त्यांच्या घरामध्ये पसरलेला गाळ स्वच्छ केल्याशिवाय ते राहू शकणार नाहीत.
या वाड्या वस्त्यांमध्ये स्वच्छता करण्यासाठी कार्यकर्त्यांची आवश्यकता आहे. पुण्यातील विविध गणेशोत्सव मंडळ कार्यकर्ते,ढोल ताशा पथके, विविध संस्था यात विशेष पुढाकार घेऊ शकतात.
या गावांना पोहोचण्यासाठी सहा तासाचा अवधी लागतो. प्रवासाचे 12 तास आणि तिथे आठ तासाचे काम असे साधारणपणे वीस तास आपण तिथे श्रमदान करू शकतो.
आपण सर्वांनी याविषयी विचार करून आपला प्रतिसाद सोबत दिलेल्या नंबर वर कळवावा असे आवाहन भोई प्रतिष्ठान आणि सेवा मित्र मंडळ यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Exit mobile version