Site icon Jan Bharat Samachar

स्तनकर्करोगावरील उपचारांमध्ये आयुर्वेद रसायन थेरपी प्रभावी

Spread the love
पुणे: स्तनाच्या कर्करोगांवर आयुर्वेद रसायन थेरपी प्रभावी ठरत असून, यामुळे स्तनकर्करोग रुग्णांचे जीवनमान सुधारण्यात मदत होत आहे. स्तन कर्करोगाचा आजार व उपचार यामुळे शारीरिक व मानसिक त्रास सहन निर्णय रुग्णांना या थेरपीचा अधिक फायदा झाल्याचे संशोधन दिसून आले आहे, अशी माहिती रसायु कॅन्सर क्लिनिक व संशोधन केंद्राचे वैद्यकीय संचालक डॉ. योगेश बेंडाळे यांनी दिली.
सिंगापूर येथे ५ ते ७ डिसेंबर २०२५ या कालावधीत आयोजित ‘एस्मो एशिया काँग्रेस २०२५’ या जागतिक कर्करोग परिषदेत पुण्यातील रसायु कॅन्सर क्लिनिकमध्ये झालेले संशोधन सादर करण्यात आले. स्तनाच्या कर्करोगाच्या उपचारांमध्ये आयुर्वेद रसायन थेरपी किती उपयोगी आहे, याचा अभ्यास करण्यात आला. कॉम्प्लिमेंटरी आयुर्वेदिक रसायन थेरपी स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्णांचे जीवनमान (दैनंदिन जगण्याची गुणवत्ता) लक्षणीयरीत्या सुधारू शकते, हे रसायू कॅन्सर क्लिनिकने केलेल्या या अभ्यासातून आढळले आहे. परिषदेच्या माध्यमातून या संशोधन अभ्यासाची माहिती जगभरातील रुग्ण आणि संशोधक यांपर्यंत पोहोचली.
डॉ. योगेश बेंडाळे म्हणाले, “इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनुसार ((आयसीएमआर), भारतातील स्त्रियांमध्ये दिसणाऱ्या सर्व कर्करोगांपैकी सुमारे २८ टक्के स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण आहे. आधुनिक वैद्यकीय उपचारांनी जीवनावधी वाढवला असला तरी, केमोथेरपी, रेडिओथेरपी किंवा शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना थकवा, चिंता, नैराश्य, झोपेची समस्या आणि रोग पुन्हा होण्याची भीती यांसारख्या लक्षणांचा सामना करावा लागतो. परिणामी, अनेक भारतीय महिला रोगामुळे आणि आधुनिक उपचारांमुळे कमी झालेले जीवनमान सुधारण्यासाठी कॉम्प्लिमेंटरी उपचारांकडे वळतात आणि त्याचा अवलंब करतात.”
रसायू कॅन्सर क्लिनिकने २०२१ ते २०२३ दरम्यान आयुर्वेदिक उपचार घेतलेल्या २५४ स्तनाच्या कर्करोग रुग्णांच्या माहितीचा अभ्यास केला. काही रुग्णांनी, पाश्चात्य वैद्यक उपचार पूर्ण केल्यानंतर कर्करोग पुन्हा होऊ नये म्हणून आयुर्वेदाचा अवलंब केला, काहींनी रोगाची वाढ मंदावण्यासाठी, रोगाच्या वाढीस प्रतिबंध करण्यासाठी, तर काहींनी मुख्यतः आपले जीवनमान सुधारण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेतले. त्यातून पाश्चात्य वैद्यकशास्त्राच्या उपचारांसोबत आयुर्वेदिक उपचार घेतलेल्या रुग्णांना येणारा थकवा, चिंता, नैराश्य आणि झोपेची समस्या यामध्ये सुधारणा झाली. तसेच, त्यांच्या दैनंदिन जीवनाची गुणवत्ता सुधारली.
विशेषतः चौथ्या स्टेजमधील रुग्णांनी किमान ९० दिवस आयुर्वेदिक थेरपी घेतल्यास चिंता, नैराश्य, झोपेची अडचण आणि इतर लक्षणे कमी झाली. तसेच, त्यांचे दैनंदिन जीवन आणि एकंदर जीवनमान दोन्ही सुधारले, हे संशोधनातून दिसून आले. हे निष्कर्ष भारतातील आयुर्वेदिक कर्करोग संशोधनासाठी महत्वाचे ठरतील. यामुळे कर्करोगतज्ज्ञ आणि आयुर्वेदिक डॉक्टर एकत्र काम करायला प्रोत्साहित होतील. एकत्रित उपचारांना अधिक मान्यता मिळेल आणि त्यातून रुग्णांना अधिक फायदा होईल, असे डॉ. बेंडाळे यांनी नमूद केले.
संशोधनाची वैशिष्ट्ये:
– जागतिक कर्करोग मंचावर रुग्णांनी दिलेली माहिती महत्त्वाची
– आयुर्वेद रसायन थेरपी रुग्णांच्या अपूर्ण आणि दुर्लक्षित वैद्यकीय गरजा पूर्ण शकते
– कर्करोग तज्ञ आणि आयुर्वेदिक डॉक्टरांनी एकत्र काम करून पारदर्शकता व संवाद ठेवावा
– रुग्णहितासाठी एकात्मिक ऑन्कोलॉजीच्या यशस्वी विकासासाठी फार महत्त्वाचे आहे.
– कर्करोगाच्या उपचारात आयुर्वेदाने रुग्णांचे आरोग्य सुधारेल हे सर्वांपर्यंत पोहोचावे
—————
Exit mobile version