पुणे: “महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार केवळ स्मरणापुरते न राहता कृतीत उतरले पाहिजेत. संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नसून समाजपरिवर्तनाचे साधन आहे. त्यामुळे भारतीय संविधानातील मूल्ये, लोकशाहीचे महत्व, स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचा संदेश तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी ‘संविधान जागर अभियान’ देशव्यापी पातळीवर राबविणार आहे,” असे मत फुलेप्रेमी कवी, संविधानदूत विजय वडवेराव यांनी व्यक्त केले.
देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्यजागर अभियानांतर्गत दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलच्या समारोपावेळी वडवेराव बोलत होते. नवी पेठेतील एस. एम. जोशी फाउंडेशनच्या सभागृहात झालेल्या महाराष्ट्रासह देशविदेशातून ८०० कवी, साहित्यिक, विचारवंत, कलाकार सहभागी झाले होते.

संविधान जागर अभियानात भरीव योगदान दिल्याबद्दल आंतरराष्ट्रीय फुलेप्रेमी समाजरत्न पुरस्कार डॉ. मंजू राजेजाधव (सिंदखेडराजा, बुलढाणा), उज्ज्वला फुलसुंदर (पुणे), दत्तात्रय भोसले (परभणी), मधुकर नाईक (पुणे), मनिषा शिंदे (पुणे), पुंडलिक काटकर (गडचिरोली), सिद्धार्थ पानपाटील (धुळे), अनिल नाटेकर (आळंदी), चरण जाधव (छ. संभाजीनगर), संदेश कर्डक (मुंबई), शारदा गणोरकर (अमरावती), गायत्री रामटेके (बल्लारपूर, चंद्रपूर), शोभा धामस्कर (मडगाव, गोवा), वैशाली लांडगे (पुणे) यांना, तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संविधानदूत पुरस्कार विद्या मलवडकर (सातारा), दुर्गा राऊत (माजलगाव, बीड), प्रतिभा किर्तीकर्वे (पुणे), पूनम पाटील (जळगाव), नंदा मघाडे (जळगाव), क्रांती वेंदे (धुळे), बबन चव्हाण (पुणे), सरिता कलढोणे (जुन्नर, पुणे) यांना प्रदान करण्यात आला. भारतीय संविधान ग्रंथ, पुरस्कार सन्मानचिन्ह, संविधानमय शालेय पॅड, प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. तसेच सावित्रीआई फुलेंच्या वेशभूषेसाठी २०० कवयित्रिंना हिरवे लुगडे भेट देण्यात आले.