Site icon Jan Bharat Samachar

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना २००० रुपये प्रतिक्विंटल दर द्या; अन्यथा काँग्रेसचे राज्यभर आंदोलन – गोपाळदादा तिवारी

Spread the love

सासवड, दि. १८ : केंद्र सरकारच्या कांदा, साखर व इतर शेतीमालावरील दीर्घकालीन निर्यात बंदी धोरणामुळे कांदा – साखरेस योग्य भाव भाव न मिळाल्याने, राज्यातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे खचला असून उत्पादन खर्च काढणे आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेही कठीण झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने नाफेड व राज्य फेडरेशनमार्फत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने किमान २००० रुपये प्रतिक्विंटल खरेदी दर द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली. अन्यथा काँग्रेस राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला.
सासवड येथील जयप्रकाश चौकात “पुरंदर तालुका काँग्रेस कमिटी” व “पुणे जिल्हा काँग्रेस”तर्फे कांदा उत्पादक शेतकरी, नीट परीक्षा पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या निषेधार्थ आयोजित आंदोलनात ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, केंद्र सरकारच्या सततच्या कांदा व साखर निर्यातबंदीच्या धोरणामुळे कांदा व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वारंवार नुकसान सहन करावे लागत आहे. सरकारच्या आडमुठ्या व लहरी धोरणांमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आखाती देशांतील हक्काची बाजारपेठ गमावली आहे. निवडणुकीपूर्वी शेतमाल हमीभावाबाबत दिलेली आश्वासने सरकारने तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणीही त्यांनी केली.
यावेळी विविध वक्त्यांनी केंद्र सरकारवर विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ केल्याचा आरोप करत, नीट प्रवेश परीक्षा व्यवस्थित हाताळण्यात सरकार अपयशी ठरल्याची टीका केली. शिक्षणाचा बाजार मांडून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी क्रूर थट्टा करण्यात येत असल्याचेही त्यांनी म्हटले.

आंदोलनात पुणे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्रीरंग चव्हाण, पुरंदर तालुका काँग्रेस अध्यक्ष साहेबराव फडतरे, महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेस उपाध्यक्ष प्रा. सचिन विमल, रामचंद्र दुर्गाडे, दत्ताशेठ झुरुंगे, गणेश ढोणे, प्रदीप पोमण, माऊली भोराडे, जिल्हा कार्याध्यक्ष लहुआण्णा निंवगुणे, ओबीसी अध्यक्ष राजेंद्र बरकडे, युवक अध्यक्ष उमेश पवार, बापू मोकाशी, बाळासाहेब कड, संदीप भोसले, युथ काँग्रेसचे ऋषीकेश जगताप, अतिश जगताप, राजन पवार आदी उपस्थित होते.
आंदोलनाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन दुर्गाडे यांनी केले. यावेळी भोर–पुरंदर परिसरातील संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदा फेकून निषेध नोंदविला.

Exit mobile version