पुणे: “हजारो वर्षांची परंपरा असलेल्या आयुर्वेदाला २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजाश्रय दिला आणि स्वतंत्र आयुष मंत्रालयाची स्थापना करून आयुर्वेदशास्त्राच्या संशोधनासाठी मार्ग मोकळा केला. वैद्य योगेश आणि वैद्य विनीता बेंडाळे यांची रसायू लाईफ सायन्सेस ही संस्था, आयुर्वेदातील संशोधनावर आधारित औषधांसाठी सकारात्मक कार्य, जागतिक मान्यताप्राप्त प्रमाणित नवी औषधे संशोधित करत आहे, हे अभिमानास्पद आहे. या नव्या वास्तूच्या माध्यमातून आयुर्वेद संशोधनाचे कार्य अधिक गतिमान होईल,” असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी केले. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ आयुर्वेदाला संशोधन व तंत्रज्ञानाची जोड देत हजारो रुग्णांना बरे करणाऱ्या रसायू लाईफ सायन्सेस या संस्थेच्या नूतन वास्तूचा उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. डाॅ. सावंत यांच्या हस्ते आणि विज्ञान-तंत्रज्ञान विषयक संसदीय स्थायी समितीच्या अध्यक्षा व राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. कर्वेनगर येथील संस्थेच्या वास्तूत झालेल्या सोहळ्यात निमंत्रक वैद्य योगेश बेंडाळे, वैद्य विनिता बेंडाळे उपस्थित होते. दीपप्रज्ज्वलन आणि धन्वंतरी पूजन व स्तवनाने कार्यक्रमाचा आरंभ झाला.
डाॅ. प्रमोद सावंत म्हणाले, “आयुर्वेदाला पाच हजार वर्षांहूनही मोठी परंपरा आहे. मात्र, मध्यंतरीच्या काळात आयुर्वेद दुर्लक्षित राहिला. अगदी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावरही आयुर्वेदाकडे योग्य तसे लक्ष दिले गेले नाही. केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार येताच, परिस्थिती बदलली. आयुष मंत्रालयाच्या निर्मितीने, आयुर्वेद संशोधनाला राजाश्रय मिळाला आणि संशोधनाने गती घेतली. बेंडाळे यांनी ३० वर्षांहून अधिक काळ सुरू ठेवलेले संशोधन, डाटा, केस स्टडीज आणि आधुनिक काळातील पर्सनलाईज मेडिसीन या संकल्पनेचे आयुर्वेदाशी असलेले नाते यांचा मेळ कौतुकास्पद आहे. विशेषतः कर्करोगाच्या विविध प्रकारांवर बेंडाळे यांचे संशोधन मोलाचे आहे.”
प्रा. डा. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “बेंडाळे हे लोकसेवेचे व्रत घेऊन आयुर्वेदप्रणित संशोधन करत आहेत. रोगाच्या मूळाशी जाऊन विचार व उपचार करण्याची त्यांची पद्धत आणि देशविदेशांत सातत्याने आयुर्वेदप्रणित संशोधन शास्त्रशुद्ध पद्धतीने सादर करण्याचा त्यांचा उपक्रम उल्लेखनीय आहे. तसेच परवडणारी औषधे विकसित करण्याचा प्रयत्न महत्त्वाचा आहे.”
वैद्य योगेश बेंडाळे म्हणाले, “१९९६ पासून पाश्चात्त्य वैद्यकाच्या तुलनेत आयुर्वेद हे शास्त्र म्हणून कमी पडते आहे की आयुर्वेदतज्ज्ञ कमी पडत आहेत, याचा शोध घेताना, रसायू लाईफ सायन्सेसची संकल्पना रुजली. ३० वर्षांच्या अथक संशोधनातून ४५ पेक्षा जास्त पेटंट्स प्राप्त करण्यापर्यंत प्रवास झाला आहे. नुकतेच जगातले पहिले ओरल ड्रग (तोंडाने घ्यावयाचे औषध) जागतिक आरोग्य व्यासपीठावर सादर केले आहे. नव्या वास्तूमधूनही संशोधनावर भर देत निरामयतेकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न राहील.”
डाॅ. प्रतीक तोरणे यांनी सूत्रसंचालन केले. वैद्य योगेश बेंडाळे यांनी आभार मानले.

