पुणे: ग्रामगौरव फाउंडेशन या राज्यस्तरीय संस्थेशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र ग्रामविकास परिषदेच्या प्रदेशाध्यक्षपदी भाग्यश्री विवेक ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामीण विकास क्षेत्रातील त्यांची कार्यतत्परता, नेतृत्वगुण आणि सामाजिक बांधिलकीची दखल घेत हा निर्णय जाहीर करण्यात आला. परिषदेचे संस्थापक प्रणेते विवेक ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थापक कार्याध्यक्ष सुभाष मराठे यांनी भाग्यश्री ठाकरे यांच्या ग्रामीण विकास क्षेत्रातील अभ्यास, कार्याची आवड आणि संघटन कौशल्याचा गौरव करत त्यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती जाहीर केली.
महाराष्ट्र ग्रामविकास परिषद ही राज्यातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद यांच्या समन्वयातून ग्रामीण विकासासाठी कार्यरत असलेली संघटना आहे. शासनाच्या विकासाभिमुख धोरणांची प्रभावी अंमलबजावणी, शासन निर्णय, परिपत्रके आणि विविध कल्याणकारी योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचविणे तसेच पंचायतराज व्यवस्थेतील सर्व घटकांना संघटित करून त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी परिषद सातत्याने कार्यरत आहे.
या पदाच्या माध्यमातून राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींशी संबंधित धोरणात्मक विषयांवर समन्वय साधणे, तसेच सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, पाणीपुरवठा कर्मचारी, संगणक परिचालक, रोजगार हमी योजनेचे रोजगार सहाय्यक आणि पंचायतराज व्यवस्थेतील सर्व घटकांच्या अडीअडचणी, प्रलंबित प्रश्न व रास्त मागण्यांसाठी संघटनात्मक पातळीवर प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.राज्यभर महाराष्ट्र ग्रामविकास परिषदेचे जाळे अधिक सक्षम करत ग्रामीण विकासाला नवी दिशा देण्यासाठी भाग्यश्री ठाकरे यांच्या नेतृत्वाचा निश्चितच मोलाचा वाटा उरेल, असा विश्वास नियुक्तीपत्रात व्यक्त करण्यात आला आहे. भाग्यश्री विवेक ठाकरे यांच्या नियुक्तीबद्दल विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व ग्रामविकास क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

