पुणे, २० जुलै २०२६ (प्रतिनिधी): महावितरणतर्फे राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट मीटर मोहिमेला पुणे शहरात आणि परिसरात ग्राहकांकडून प्रचंड सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. ग्राहकांच्या मनातील शंकांचे निरसन करण्यासाठी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये जाऊन थेट मेळावे घेत आहेत. या जनजागृतीमुळे पुणे परिमंडलात एकूण १४,१३,१९३ स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. स्मार्ट मीटरच्या जनजागृतीसाठी मुख्य अभियंता सुनिल काकडे यांनी मंडलनिहाय पूर्णवेळ पथके तयार केली आहेत. प्रत्येक पथकांमध्ये दोन अभियंत्यांसह ५ जणांचा समावेश असून, ही पथके मोठमोठ्या गृहनिर्माण संस्थांमध्ये जाऊन तेथील सभासंदांना एकत्र करुन स्मार्ट मीटरचे फायदे समजावून सांगत आहेत. त्यांच्या विविध प्रश्ंनाना उत्तरे देऊन त्यांचा गैरसमज दूर करत आहेत. एका आठवड्यात या पथकांनी सुमारे २०० ठिकाणी मेळावे घेऊन ४० हजारांहून अधिक वीज ग्राहकांची जनजागृती केली आहे. तसेच दोन चित्ररथ (LED Van) देखील गर्दीच्या ठिकाणी स्मार्टमीटरची जनजागृती करत आहेत.
पुणे परिमंडलात एकूण ३९ लाख वीजमीटर आहेत. त्यापैकी गणेशखिंड शहर मंडलात ५,२८,३२६, रास्तापेठ शहर मंडलामध्ये ५,२४,२२२ आणि पुणे ग्रामीण मंडलात ३,६०,६४५ स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत.
वीज ग्राहकांना आवाहन
स्मार्ट मीटर हे ग्राहकांच्या सोयीसाठी आणि वीज वितरण यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. सोशल मिडियाद्वारे पसरविल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवता, महावितरणच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. आपल्या सोसायटीत कर्मचाऱ्यांची पथके आल्यास त्यांच्याकडून शंकांचे निरसन करून घ्यावे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून महावितरणला सहकार्य करावे.
स्मार्ट मीटरचे फायदे
- सौर तासांत विशेष सवलत: सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत वीज वापरल्यास ग्राहकांना प्रति युनिट ८५ पैसे इतकी (TOD) सवलत थेट वीजबिलात मिळते.
- अचूक वीजबिल: मानवी हस्तक्षेपाशिवाय थेट डिजिटल रिडिंग होत असल्याने चुकीच्या किंवा अंदाजे बिलाची शक्यता पूर्णपणे संपुष्टात येते.
- वीज वापराचे नियंत्रण: ग्राहक मोबाईल ॲपद्वारे आपल्या दैनंदिन आणि तासाभराच्या वीज वापराचा आलेख कधीही पाहू शकतात. यामुळे ग्राहकाला वीजबचतीचे नियोजन करता येते.
- बिघाड समजतो : तांत्रिक बिघाड किंवा वीज पुरवठ्यातील समस्येची माहिती महावितरणला तात्काळ समजते, ज्यामुळे बिघाड लवकर दुरुस्त करणे शक्य होते.

