पुणे : केवळ धार्मिक विधी नाही, तर सामूहिक आध्यात्मिक जागरण असलेला सलग २१ दिवसांचा अतिरुद्र महायज्ञ श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात रविवार, दि. २६ जुलै पासून सुरु होणार आहे. संपूर्ण विश्वात शांती व सद््भावना निर्मितीकरिता श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळा च्यावतीने आयोजित अतिरुद्र महायागात तब्बल ६५ ब्रह्मवृंद सहभागी होणार असून दि. २६ जुलै ते १५ आॅगस्ट दरम्यान दररोज दुपारी १ ते सायंकाळी ७ यावेळेत मंदिरात हा महायाग होणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी दिली.
अतिरुद्र महायागाचे हे ६ वे वर्ष आहे. मंदिराच्या सभामंडपात भव्य होमकुंड साकारुन हे अतिरुद्र होम करण्यात येणार आहे. वेदमूर्ती नटराज शास्त्री यांसह ६५ ब्रह्मवृंद यामध्ये सहभागी होतील. रविवार, दि. २६ जुलै रोजी महासंकल्प, नांदी श्राद्ध, वैष्णव श्राद्ध, पुण्याह वाचन, महान्यास, गणेश अर्चना, रुद्र जप, गणेश याग, रुद्र होम, अरुणाप्रश्न यागाने अतिरुद्र महायज्ञास प्रारंभ होईल. तर, पुढील २० दिवसांत दररोज गणेशयाग, रुद्र होम, महंण्यास मंत्रघोष होणार असून दुर्गा होम, स्वयंवर पार्वती होम, नक्षत्र होम, पुरुषसुक्त होम, महासुदर्शन होम, संतान गोपाल कृष्ण होम, मेधा दक्षिणा मूर्ती होम यांसह दररोज विविध धार्मिक विधी होणार आहेत.
अतिरुद्र यज्ञ ही केवळ पूजा नसून, एक आध्यात्मिक ऊर्जा प्रक्षेपण आहे. वेदांनुसार, या यज्ञामुळे व्यक्ती, कुटुंब व जग यांच्यात संतुलन व शुद्धता येते. हा यज्ञ जेथे होतो तेथे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. मनुष्यातील चेतनापेशी उर्जित होतात आणि कार्यमग्नता वाढते. एक लघुरुद्र म्हणजे ११ ब्रह्मवृंदांनी ११ वेळा रुद्रपठण करणे, असे ११ लघुरुद्र म्हणजे १ महारुद्र आणि ११ महारुद्र म्हणजे १ अतिरुद्र होय. अतिरुद्राच्या या मोठया व्यापकतेमुळे वायुमंडल शुद्धधी होऊन सर्व जीवजंतू दूर होतात व सर्व आजारांपासून मुक्ती मिळते.
अतिरुद्र यज्ञामुळे संपूर्ण समुदाय, गाव, शहर किंवा राष्ट्र स्तरावर अनेक अद््भूत सकारात्मक बदल घडून येतात. दीर्घकाळचे व मानसिक आजारातून मुक्तता, नकारात्मक ऊर्जा दूर होणे, पर्यावरणातील असंतुलन दूर होते, नैसर्गिक आपत्ती कमी होतात आणि संपूर्ण विश्वात शांती व सद्भावना निर्माण होते, हे अतिरुद्र महायज्ञाचे फायदे आहेत. त्यामुळे दगडूशेठ गणपती मंदिरात मागील पाच वर्षांपासून हा यज्ञ करण्यात येत आहे.

शुक्रवार, दिनांक १४ आॅगस्ट पर्यंत दररोज दुपारी ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत धार्मिक विधी मंदिरात सुरु राहणार आहेत. शनिवारी (दि.१५) ३३ कोटी देवता याग व हर्विद्रव्य वनौषधीसहित पूर्णाहुती होणार आहे. मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांद्वारे जगाच्या कल्याणाकरिता व आरोग्यसंपन्न समाजाकरीता प्रार्थना करण्यात येत आहे. त्यातील अतिरुद्र होम हा या धार्मिक विधींतील सर्वोच्च बिंदू आहे. ‾
गंगा, यमुना, इंद्रायणी, पंचगंगा, मुठा, अष्टविनायक येथील नद्या, ज्योर्तिलिंग नद्या, रामेश्वरम २१ कुंडांचे जल याकाळात वापरले जात आहे. तसेच २१ आयुर्वेदिक औषधी वापर होम-हवनाच्या वेळी करण्यात येत आहे. सर्व नद्यांच्या एकत्रित केलेल्या मंत्रोच्चारीत पाण्याचा श्रींना जलाभिषेक करण्यात येत आहे. तरी भाविकांनी मंदिरात अतिरुद्र याग व विविध धार्मिक कार्यक्रमांत सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.