Jan Bharat Samachar

आळंदी ज्ञानभूमी प्रकल्पाला गती देणार : बावनकुळे

Spread the love

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जन्मोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आळंदीस विशेष भेट दिली. आळंदीतील ज्ञानभूमी प्रकल्पाच्या प्रगती बाबत आढावा घेतला. या प्रकल्पाला गती देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. आळंदी देवस्थानच्या वतीने विश्वस्त मंडळाने त्यांचे समवेत संवाद साधला. यावेळी प्रकल्पाची माहिती जाणून घेत प्रकल्पास गती देण्यास प्राधान्य देण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली. आळंदीतील गायरान असलेली सुमारे ४५० एकर जागेत हा प्रकल्प साकारला जाणार आहे. या प्रकल्पाचे महत्त्व धार्मिक दृष्ट्या खूप आहे.या वेळी ते म्हणाले, ज्ञानभूमी प्रकल्प केवळ वारकऱ्यांसाठी नव्हे, तर राज्याच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक विकासासाठी देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यास शासनाचे पूर्ण सहकार्य होईल. प्रकल्पाच्या प्रगतीसाठी आवश्यक असणारी सर्व मदत शासन स्तरावरून करण्यात अशी ग्वाही त्यांनी दिली.


या प्रकल्पाच्या माध्यमातून वारकऱ्यांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, या प्रकल्पाच्या माध्यमातून आळंदीच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैभवात भर पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तसेच माऊलींच्या ७५० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्भर मोठे कार्यक्रम, उपक्रम, उत्सव व्हावे यासाठी शासन स्तरावर जी.आर.काढू असे ही त्यांनी सांगितले. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आळंदी भेटीत भूमिका स्पष्ट करतील.
आळंदी येथे सुरू असलेल्या या भव्य सोहळ्यात राज्याच्या विविध भागातून हजारो भाविक दाखल झाले असून, येथील वातावरण पूर्णपणे भक्तिमय झाले आहे. यावेळी देवस्थान तर्फे मंत्री बावनकुळे यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांचे हस्ते करण्यात आला.

Exit mobile version