Site icon Jan Bharat Samachar

देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांबद्दल आदरभावा बरोबरच सेवाभावही आवश्यक- मंत्री नितीन गडकरी

Spread the love

पुणे: देशासाठी सर्वस्वाचा त्याग करण्याची तयारी ठेवणाऱ्या सैनिकांबद्दल आदर भाव व्यक्त करण्याबरोबरच प्रसंगी त्यांच्याबद्दल सेवाभाव ठेवणे आणि तो कृतीत उतरवणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केंद्रीय दळणवळण व महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

देशरक्षणाचे कर्तव्य पार पाडताना अपंगत्व पत्करणाऱ्या सैनिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मराठी पत्रकार संघाने आयोजित केलेल्या ‘नेशन फर्स्ट’ या कार्यक्रमात गडकरी बोलत होते. कर्तव्य बजावताना अपंगत्व पत्करलेल्या भारतीय सैन्य दलातील तसेच सीमा सुरक्षा दलातील जवानांचा यावेळी गडकरी यांच्या हस्ते पदक आणि राष्ट्रध्वज देऊन सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे समाजहित डोळ्यासमोर ठेवून पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संपादक आणि पत्रकारांचा देखील या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाला सिम्बायोसिस शिक्षण संस्थेचे संस्थापक शां.ब मुजुमदार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, तरुण भारत बेळगाव सल्लागार संपादक किरण ठाकूर, लोकमत वृत्त समूहाचे समूह संपादक विजय बाविस्कर, पुढारीच्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक सुनील माळी, पुण्यनगरीचे संचालक भावेश शिंगोटे, राष्ट्रीय मराठी मोर्चाचे संस्थापक आनंद रेखी, लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे व्यवस्थापक सुशील जाधव आणि मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

देशासाठी सर्वस्वाची होळी करण्याची तयारी ठेवणाऱ्या जवानांना समाजाकडून सहानुभूतीची नव्हे तर सहकार्याची आवश्यकता आहे. जवानांबद्दल कृतज्ञता बाळगणे हे नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे, असे गडकरी यांनी नमूद केले. मराठी पत्रकार संघाने जवानांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केलेला कार्यक्रम अनुकरणीय असून समाजातील इतर संस्थांनी देखील असे कार्यक्रम आयोजित करावे, असे आवाहनही गडकरी यांनी केले.

‘नेशन फर्स्ट’ ही केवळ घोषणा नाही. तो एक दृष्टिकोन आहे. संकल्प आहे. नेशन फर्स्ट ही संकल्पना केवळ संरक्षणापूर्ती मर्यादित नाही. आपले प्रत्येक कृत्य देशाच्या हिताचे आहे की नाही हा विचार प्रत्येकाने करणे आवश्यक आहे. नेशन फर्स्ट हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, असे डॉ मुजुमदार यांनी नमूद केले.

अपंग जवानांचे जीवन सुकर करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या क्वीन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूटचे अधिष्ठाता कर्नल वसंत बल्लेवार यांनी सत्कारार्थी जवानांच्या अभिमानास्पद कामगिरीचा थोडक्यात परिचय करून दिला. पुणेकरांमध्ये जवानांबद्दल असीम प्रेम असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

पत्रकारांना सामाजिक भान असणे आवश्यक आहे. त्यामुळे पत्रकारांची संघटना म्हणून मराठी पत्रकार संघ पत्रकारांसाठी कल्याणकारी योजना राबविण्याबरोबरच मोठ्या प्रमाणावर सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देत असल्याचे किरण जोशी यांनी प्रास्ताविकात सांगितले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या पत्रकार आरोग्य योजनेचा आणि भगवद्गीता फॉर ऑल च्या वतीने पत्रकारांच्या मुलांसाठी व्यक्तिमत्व विकास कार्यक्रमाचा शुभारंभ या कार्यक्रमात करण्यात आला.

यावेळी विजय बाविस्कर, सुनील माळी,भावेश शिंगोटे यांनी देखील मनोगत व्यक्त केले. संदीप चव्हाण यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.

 

चौकट – 

आदर्श पत्रकार पुरस्कारार्थी :

सुरेश साखवळकर -संपादक-साप्ताहिक अंबर 

अविनाश कोळी – दैनिक लोकमत ,सांगली 

सुनील दिवाण – एबीपी माझा ,पंढरपूर 

अशोक मोराळे- दैनिक पुढारी ,पुणे 

नितीन काळे-दैनिक लोकमत ,सातारा 

संजय गायकवाड – दैनिक तरुण भारत ,सांगली 

श्रीमती इंदुमती गणेश -दैनिक लोकमत ,कोल्हापूर 

 रवींद्र लव्हेकर- टीव्ही 9 मराठी,पंढरपूर 

युसुफ रहीम शेख -दैनिक दिव्य मराठी,सोलापूर 

प्रशांत घाडगे – दैनिक सकाळ ,सातारा

Exit mobile version