अ. भा. मराठी साहित्य संमेलन उद्यान देशाच्या इतिहासात नोंद होणारा उपक्रम ठरेल : उदय सामंत
गुजर-निंबाळकरवाडी येथील सरहद संस्थेच्या आवारात भूमिपूजन सोहळा .. हाच मराठी भाषेचा खऱ्या अर्थाने प्रचार आणि प्रसार : उदय सामंत

पुणे : आज आपण मातृभाषेला विसरत चाललो आहोत. अशा परिस्थितीत 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात येणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष व स्वागताध्यक्षांची ओळख दर्शविणारे उद्यान हा देशाच्या इतिहासात नोंद होणारा उपक्रम ठरेल, असा विश्वास मराठी भाषा व उद्योग मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. सरहद संस्थेत काश्मिरी भगिनीने गायलेले महाराष्ट्र अभिमान गीत हेच मराठी भाषेचे संवर्धन आहे; हाच मराठी भाषेचा खऱ्या अर्थाने प्रचार आणि प्रसार आहे, असेही ते गौरवाने म्हणाले.
गुजर-निंबाळकरवाडी येथील सरहद संस्थेच्या आवारात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उद्यान उभारण्यात येत असून या उद्यानाचे भूमिपूजन आज (दि. 22) मंत्री सामंत यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी अध्यक्षस्थानी होते. सरहद, पुणेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, डॉ. शैलेश पगारिया, अनुज नहार, समन्वयक लेशपाल जवळगे, झाहिद भट, वैभव वाघ, प्रमोद भानगिरे, संतोष बालवडकर उपस्थित होते.
उद्यानाचे भूमिपूजन माझ्या हस्ते होत आहे याचा आनंद आहे, असे सांगून उदय सामंत पुढे म्हणाले, उद्यानाच्या माध्यमातून देशातील पहिले साहित्य दालन सर्वसामान्यांसाठी खुले होणार आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व स्वागताध्यक्ष यांच्या कार्याची ओळख जगासमोर येणार आहे. सरहदच्या माध्यमातून मराठी भाषेसाठी तसेच मराठी भाषाप्रेमी एकत्र येण्यासाठी महत्त्वाचे कार्य सातत्याने घडत आहे. मराठी साहित्य व मराठी भाषेसाठी उत्तमोत्तम संकल्पना राबवून त्या परिपूर्णत्वास नेणे हे संजय नहार यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. याच कार्यातून परदेशातही मराठी भाषेचा जागर व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. इंग्रजी भाषेला पर्यायी मराठी शब्द शोधण्यासाठी सरहदने पुढाकार घेऊन मोहीम राबवावी, असे आवाहन उदय सामंत यांनी केले.
साहित्य संमेलन उद्यानाच्या संकल्पनेची माहिती सांगताना संजय नहार म्हणाले, या उद्यानाच्या माध्यमातून आजपर्यंत झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्ष व स्वागताध्यक्षांची ओळख जगासमोर आणली जाणार आहे. साहित्य, भाषा, कला, संस्कृती यांचा सुंदर मिलाफ साधणारे हे केंद्र ठरेल. ‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ ही कविकल्पना न राहता ती सत्यात आणण्यासाठी सरहद सतत कार्यरत आहे.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, साहित्य संमेलने ही महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव असतात. समाजाला वैचारिक दिशा देण्याचे कार्य करतात. शंभराव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाकडे वाटचाल सुरू असताना सरहदच्या माध्यमातून निर्माण होणारे हे उद्यान वैचारिक उर्जा देणारे केंद्र ठरेल. साहित्यिकांच्या विचारांच्या सावलीत साहित्यप्रेमी अनोखा आनंद घेतील. साहित्य संमेलनांचे अध्यक्ष वेगवेगळ्या विचारधारांचे असले तरी सर्वसमावेशक भूमिका घेऊन समाजाला दिशा देण्याचे कार्य करतात तसेच कार्य या उद्यानाच्या माध्यमातून घडेल असा विश्वास वाटतो. साहित्य संमेलन संपले की, काही महिन्यातच संयोजकांचे नाते तुटते, परंतु सरहदच्या या अनोखा उपक्रमातून संजय नहार यांनी हा धागा कधीच तुटू दिला नाही. ते अंतर्बाह्य साहित्यप्रेमीच आहेत. प्रा. जोशी पुढे म्हणाले, राजकारण्यांनी भाषेचा स्तर राखणे ही खूप मोठी जबाबदारी असते; कारण भाषा ही संस्कृतीची निदर्शक असते. मराठी भाषा टिकविण्यासाठी शासन, साहित्य मंडळे, शिक्षण संस्था आणि समाज यांनी एकत्रितपणे कार्य करणे आजच्या काळाची गरज आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस काश्मिरी गायिका शमिमा अख्तर यांनी महाराष्ट्र गीत सादर केले. उद्यानाची उभारणी करण्यात मोलाचे योगदान देणारे राजेश दुधाणे, किरण भामरे, रणजित पायगुडे, सचिन सानप यांचा सत्कार या वेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेशपाल जवळगे यांनी केले तर आभार वैभव वाघ यांनी मानले.
फोटो ओळ : गुजर-निंबाळकरवाडी येथील सरहदच्या आवारात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उद्यानाचे कुदळ मारून भूमिपूजन करताना उदय सामंत. समवेत प्रा. मिलिंद जोशी, संजय नहार, डॉ. शैलेश पगारिया, लेशपाल जवळगे, वैभव वाघ, संतोष बालवडकर आदी.