ब्रेकिंग न्यूज़मराठीमहाराष्ट्र

कर्करोग रुग्णालयाच्या कामाला तातडीने गती देण्यात येईल-उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आळंदीत पेटसिटी युनिटचे लोकार्पण

Spread the love

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : कर्करोगाची दिवसें दिवस वाढती रूग्णसंख्या विचारात घेता या रोगाचे अचूक निदान आणि रुग्णांना वेळेत उपचार मिळाल्यास प्राण वाचण्यास मदत होते. रुग्णांना जवळच्या रुग्णालयात माफक, अचूक निदान तसेच अत्याधुनिक उपचार उपलब्ध होईल यादृष्टीने राज्य शासन प्रयत्नशील आहे, पुणे विभागातील कर्करोग रुग्णालयाच्या कामाला तातडीने गती देण्यात येईल, असे आश्वासन राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.

आळंदी येथील इंद्रायणी हॉस्पिटल आणि कॅन्सर इन्स्टिट्युट येथे पेटसिटी युनिटच्या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी आमदार दिलीप वळसे-पाटील, बाबाजी काळे, माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, जिल्हा परिषद पुणेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा शैल्यचिकित्सक डॉ. नितीन देवमाने, आळंदी नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, इंद्रायणी हॉस्पिटल आणि कॅन्सर इन्स्टिट्युटचे विश्वस्त डॉ. संजय देशमुख, डॉ नितीन गोसावी, जिल्हा परिषद सदस्यता विनया मुंगसे, स्थानिक लोकप्रतिनिधी आदी मान्यवर उपस्थित होते.

श्रीमती पवार म्हणाल्या, देशात कर्करोग रुग्नांचे तसेच रोगाचे प्रमाण अतिशय वेगाने वाढत असून त्याच्या विरुध्द लढण्यासाठी अचूक निदान आणि योग्य प्रकारे उपचार महत्वाचे आहे. उपचार उशिरा सुरु झाल्यास रुग्णांचा वेळ आणि खर्चात वाढ होते; याच बाबीचा विचार करुन केंद्र आणि राज्य शासनाच्या योजने मध्ये कर्करोगावरील उपचाराचा समावेश केलेला आहे.

राज्यशासन कर्करोगा विरुद्ध लढ्यासाठी केवळ उपचारावर भर न देता प्रतिबंध आणि अचूक निदानावर विशेष लक्ष देत आहे. त्याचाच भाग म्हणून राज्यस्तरीय कर्करोग उपचार व्यवस्था सुरु करण्यात आली आहे. महाकेअर फाऊंडेशनच्या माध्यमातून कर्करोग उपचार व्यवस्था उभारण्यात येणार आहे. तसेच नागपूर येथे हायएनर्जी मेडिकल सायक्लोस्टोन प्रकल्प स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली, त्यामुळे कर्करोग उपचार, निदान आणि संशोधनाला चालना मिळणार आहे.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रुग्णालयाला भेट दिली असता रुग्णालय व्यवस्थापनाने अत्याधुनिक पेटसिटी मशीन करिता निधीची मागणी केली असता, कर्करोगाचे गांभीर्य आणि रुग्णांची गैरसोय विचारात घेता त्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या मशीन करिता २७ कोटी रुपये उपलब्ध करुन दिले. या पेटस्कॅन मशीनच्या माध्यमातून कर्करोगाचे अचूक निदान होण्यासह डॉक्टरांना आधुनिक उपचार पद्धतीचा अवलंब करता येणार आहे. सर्वसामान्य गरजू रुग्णांना या अत्याधुनिक आरोग्य सुविधांचा लाभ होणार असून त्यांचे प्राण वाचणार आहेत. इंद्रायणी रुग्णालयाने व्यवसायिक दृष्टिकोन न ठेवता नेहमीच रुग्णांना माफक दरात आरोग्य सेवेला प्राधान्य दिले आहे. हे कार्य सामजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण आहे, यापुढेही अशीच निरंतर रुग्णसेवा होत राहील, या कार्याला राज्य शासना कडून सहकार्य कऱण्यात येईल, असेही श्रीमती पवार म्हणाल्या.

वळसे पाटील म्हणाले, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नामुळे पेटस्कॅन मशीन उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या कर्करोग रुग्णालयात आर्थिकदृष्टया दुर्बल, सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात उपचार मिळत आहे, रुग्णांच्या नातेवाईकांसाठी राहण्याची व्यवस्थेची सुविधा आवश्यक आहे, राज्य शासना सोबत सेवाभावी संस्थानी मिळून हे काम करावे, आज दिवसेदिवस कर्करोगाचे प्रमाणात वाढ होत असून कर्करोगा विरुद्ध लढण्याची आपली सामाजिक जबाबदारी आहे. येत्या काळात जिल्ह्यात कर्करोगा विरुद्ध लढण्यासाठी सुसज्ज कर्करोग रुग्णालयांची उभारणी होणे गरजेचे आहे, त्यादृष्टीने प्रयत्न करण्याचीही गरज आहे, असे श्री. वळसे पाटील म्हणाले.

आमदार बाबाजी काळे म्हणाले, सामजिक बांधिलकी जपत आळंदी येथील इंद्रायणी हॉस्पिटल आणि कॅन्सर इन्स्टिट्युटच्या माध्यमातून आळंदी, खेड परिसरासह विविध भागातील रुग्णांना कर्करोगावर उपचार होत आहे, यापूढेही रुग्णसेवेच्या माध्यमातून कर्करोगमुक्त परिसर होण्यास मदत होईल, असेही काळे म्हणाले. या वेळी माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, डॉ. देशमुख यांनी आपले विचार व्यक्त केले. श्रीमती पवार यांनी कर्करोग रुग्णालयाची पाहणी करुन येथील सर्व सुविधांची माहिती घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!