जीवन शैलीपुणेब्रेकिंग न्यूज़मराठीशहर

सेवाभावी शिक्षकांमुळे दिव्यांग स्वावलंबी व स्वाभिमानी – प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी

'लायन्स'तर्फे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षकांचा आनंद मेळावा

Spread the love

पुणे. “सामान्य मुलांना शिकवताना अनेक आव्हाने असतात. अशावेळी सेवाभावी, संयमी वृत्तीने दिव्यांग मुलांना घडविण्याचे, त्यांना स्वावलंबी व स्वाभिमानी बनवण्याचे काम तुम्ही शिक्षक करत आहात. अशा विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी योगदान देत आहात, ही कौतुकास्पद बाब आहे,” असे प्रतिपादन राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केले.

सामाजिक कार्यकर्त्या सीमा दाबके यांच्या पुढाकाराने लायन्स क्लब्ज इंटरनॅशनलच्या वतीने आयोजित दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षक आनंद मेळाव्यात मेधा कुलकर्णी बोलत होत्या. टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात झालेल्या कार्यक्रमात दिव्यांग कल्याण आयुक्त प्रवीण पुरी, लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल डॉ. दीपक शहा, रमेश शहा, सचिन नहार, संयोजिका सीमा दाबके आदी उपस्थित होते. यावेळी हास्ययोग प्रशिक्षक मकरंद टिल्लू यांचे विशेष व्याख्यान झाले. कार्यक्रमात दिव्यांगत्वावर मात करून विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अमोल शिनगारे, अभिजित शिंगडे, तृप्ती चोरडिया, सारा जोशी, ऋत्विक जोशी यांचा सन्मान करण्यात आला.

प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “दिव्यांग मुलांना घडवणारे शिक्षक धैर्याचे काम करीत आहेत. शासन, प्रशासन व स्वयंसेवी संस्थांनी त्यांना सक्षम करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करायला हवेत. त्यातून निसर्गातील असमतोल कमी होण्यास मदत होईल. त्यांचे अवलंबित्व कमी करून त्याचे रूपांतर संसाधनात व्हावे. सामाजिक जाणीव असलेली अनेक मंडळी समाजात कार्यरत असून, त्यांचे कार्य सरकारला पूरक आहे. सीएसआरमधून काही चांगले उपक्रम राबवता येतील का, यावर भर दिला पाहिजे. ‘दिव्यांग’ या संकल्पनेवर भव्य प्रदर्शन भरवावे.”

प्रवीण पुरी म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षक, आई वडिलांचे योगदान असते. दिव्यांग शिक्षकांना प्रशिक्षण, नवीन तंत्रज्ञान वापराचा उपयोग यासाठी प्रोत्साहन दिले जाते. विनाअनुदानित दिव्यांग शाळांनाही विशेष अनुदान देण्याबाबत योजना राबवली जात आहे. दिव्यांग कल्याणासाठी नवनवीन उपक्रम हाती घेण्यात येत आहेत.”

डॉ. दीपक शहा म्हणाले, “समाजात चांगले काम करणारी लोकं आहेत. सेवाभावी लोकांमुळे समाज घडत असतो. दिव्यांग शिक्षक अद्वितीय काम करत आहेत. त्यांच्यातील सहनशीलता प्रेरक आहे.” उपेक्षित घटकाला सहाय्य करून त्यांच्या आयुष्यात आशेचा किरण पसरवण्याचा प्रयत्न असल्याचे रमेश शहा म्हणाले.
सीमा दाबके प्रास्ताविकात म्हणाल्या, “दिव्यांगासाठी गेली चार दशके उपक्रम सुरू आहे. या दिव्यांगाना घडवणार्‍या शिक्षकांसाठी उपक्रम करावा, या भावनेतून गेल्या वर्षीपासून हा आनंद मेळावा घेतला जात आहे. ही एकप्रकारे त्यांच्याप्रती कृतार्थता व्यक्त करण्याचा हा सोहळा आहे.”प्रज्ञाचक्षू ब्रह्मदेव काटे यांच्या गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. अंजली चौथाई यांनी सूत्रसंचालन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button