धर्ममराठीशहर

डॉ. मोहन धारिया यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त पुण्यात १४ फेब्रुवारीला ‘वनराई पर्यावरण बालोत्सव

Spread the love

पुणे; दि.१३ (शशिकांत पाटोळे) : पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया यांनी स्थापन केलेल्या ‘वनराई’ संस्थेतर्फे दि. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘वनराई पर्यावरण बालोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे.

टिळक स्मारक मंदिर, टिळक रोड, पुणे येथे सकाळी ९.०० ते दुपारी १२.०० या वेळेत हा कार्यक्रम होणार असून ‘नाळ’ चित्रपटातील राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध बालकलाकार श्रीनिवास पोकळे प्रमुख उपस्थिती दर्शविणार आहेत.‘वनराई’ संस्था गेली चार दशके पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात देशपातळीवर कार्यरत आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या बालमनावर पर्यावरण संवर्धनाचे संस्कार रुजविण्याच्या उद्देशाने संस्थेतर्फे गेल्या २५ वर्षांपासून पुण्यातील सुमारे २०० शाळांमध्ये पर्यावरण शिक्षण कार्यक्रम निशुल्क राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत पर्यावरण विषयावर निबंध लेखन, चित्रकला, विज्ञान प्रकल्प, पथनाट्य, लोककला आदी आंतरशालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.

तसेच ‘प्लास्टिक कचरामुक्त शाळा’ आणि ‘शाळेतील गुरुबाग’ यांसारख्या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक सवयी विकसित करण्यावर भर दिला जातो. वर्षभर राबविण्यात येणाऱ्या या विविध उपक्रमांचा परिपाक म्हणून दरवर्षी ‘वनराई पर्यावरण बालोत्सव’ आयोजित केला जातो.

डॉ. मोहन धारिया यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त यंदाच्या बालोत्सवात आंतरशालेय सांस्कृतिक स्पर्धेची महाअंतिम फेरी आणि वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा होणार आहे. वर्षभर पर्यावरणविषयक उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभागी झालेल्या विद्यार्थी, शाळा आणि शिक्षकांचा या वेळी पारितोषिके देऊन सन्मान करण्यात येणार आहे.कार्यक्रमास प्रवेश सर्वांसाठी खुला असून पर्यावरणप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन ‘वनराई’ संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!