गांधी भवन मधील ‘रोजा इफ्तार’ मधून सर्वधर्मीय स्नेहाचे दर्शन

पुणे . महाराष्ट्र गांधी स्मारक निधी,युवक क्रांती दल,जमाते इस्लामी हिंद,हाजी मक्केशा मस्जिद(डेक्कन) आणि जकीउल्ला जामा मस्जिद(कोथरूड) यांच्या वतीने आयोजित ‘रोझा इफ्तार ‘ कार्यक्रमातून सर्वधर्मीय सामंजस्य आणि स्नेहाचे दर्शन घडले.गुरुवार,दि.२० मार्च २०२५ रोजी गांधीभवन,कोथरूड येथे सायंकाळी ६ वाजता ‘रोजा इफ्तार’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.ज्येष्ठ काँग्रेस नेते उल्हास पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त अन्वर राजन,विश्वस्त अभय छाजेड,डॉ. अभिजीत वैद्य,शेख करीमुद्दीन,लक्ष्मीकांत देशमुख,डॉ.विश्वम्भर चौधरी,मोहन जोशी, एड.स्वप्नील तोंडे, इशाबभाई शेख, अप्पा अनारसे,तेजस भालेराव,युनुसभाई तांबटकर, अरुणा तिवारी,पैगंबर शेख, मिलिंद गायकवाड,प्रवीण वाळिंबे हे देखील उपस्थित होते.विश्वंभर चौधरी,जमात ए इस्लामी चे करीमुद्दीन शेख यांनी आपले विचार मांडले.लक्ष्मीकांत देशमुख यांनी सर्वाना शुभेच्छा दिल्या. निहाल शेख यांनी आभार मानले.कोथरूड येथील अनेक मुस्लिम महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. महिलांच्या वतीने यस्मिन शेख यांनी त्यांना या कार्यक्रमाला आमंत्रित केल्याबदद्ल आणि महिलांना नमाज पठन करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल गांधी भवन चे आभार मानले.
बंधूता निर्माण करण्याचा संकल्प – डॉ. कुमार सप्तर्षी
डॉ.कुमार सप्तर्षी म्हणाले, ‘ उपवासाचा काळ हा आत्मशुद्धीचा काळ आहे. रोझा इफ्तारचे आयोजन हे महात्मा गांधींच्या एकतेच्या विचाराशी सुसंगत आहे. सर्वांनी एकत्र राहणे ही भारताची गोडी आहे, ती जगाला कळाली आहे .या कार्यक्रमामुळे दया, क्षमा, शांती वाढीस लागेल. समविचारी व्यक्तींनी एकत्र येऊन फॅसिस्ट वृत्ती लांब ठेवल्या पाहिजेत.मी स्वतःला सगळया धर्माचा मानतो त्यामुळे मी सच्चा भारतीय आहे.सर्वांना सर्वच धर्माचा आदर केला पाहिजे.माणसाला माणसाशी जोडतो तो धर्म, तोडतो तो अधर्म .सर्वांनी भारतीय झाले पाहिजे.’
करीमुद्दीन शेख म्हणाले, ‘ सर्वधर्मीय सण एकत्र साजरे झाले तर एकात्मता वाढेल.गांधी भवन हे एकात्मतेचे केंद्र आहे. हे पुन्हा दिसून आले .आज देशामध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्य तोडण्यासाठी काही राजकीय शक्ती अफवा, गैरसमज आणि असत्य पसरवत आहेत. त्याला बळी पडलेले लोक ठिकठिकाणी हिंसाचार करीत आहेत. या गंभीर वास्तवाचे भान ठेवून आपल्याला राष्ट्रीय एकात्मतेचे मूल्य बळकट केले पाहिजे’.