समर्थ भारतासाठी प्रत्येकाच्या हाताला काम मिळणे आवश्यक आहे – पद्मश्री गिरीश प्रभुणे.

पिंपरी : समर्थ भारतासाठी, विकसित भारतासाठी प्रत्येकाच्या हाताला काम मिळणे आवश्यक आहे, प्रत्येक सुशिक्षित हा रोजगारक्षम होणे गरजेचे आहे असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री पुरस्कार प्राप्त गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र दिनानिमित्त पुनरुत्थान समरसता गुरुकुलम येथे यशस्वी संस्थेच्या वतीने प्रकाशित करण्यात येणाऱ्या यशोगाथा विशेषांकाचे प्रकाशन करताना ते बोलत होते.यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, शिक्षणामुळे मनुष्याला समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याची शक्ती मिळते, तसेच रोजगारक्षम शिक्षणामुळे त्याच्या प्रगतीचा मार्ग सुकर होतो,
त्यामुळे रोजगारक्षम पिढी घडवणारे शिक्षण ही काळाची गरज आहे असे प्रभुणे यांनी सांगितले.
यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेले राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे वरिष्ठ अधिकारी डॉ.अरुण सांगोलकर मार्गदर्शन करताना म्हणाले की, यशस्वी संस्थेमुळे कौशल्य प्रशिक्षण युक्त युवा पिढी निर्माण होत आहे ही खूप कौतुकास्पद बाब आहे; कारण देशाच्या सर्वांगीण विकासासाठी युवा पिढी कुशल असणे आवश्यक आहे.
यावेळी उपस्थित असलेल्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगावच्या शिक्षण विस्तार अधिकारी मालती रासकर त्यांच्या मनोगतात म्हणाल्या की गिरीश प्रभुणे काकांसारख्या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वामुळे गुरुकुल मध्ये देशाची आधारस्तंभ बनू शकणारी पिढी तयार होत आहे; तर यशस्वी संस्थेमुळे देशाला प्रगतीपथावर नेणारी पिढी तयार होत आहे.याप्रसंगी यशस्वी संस्थेच्या मार्केटिंग विभागाचे प्रमुख प्रशांत कुलकर्णी यांनी त्यांच्या मनोगत यशस्वी संस्थेच्या उपक्रमाबद्दल संक्षिप्त माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुनरुत्थान समरसता गुरुकुलमच्या मुख्याध्यापिका पूनम गुजर यांनी केले तर सूत्रसंचालन मारुती वाघमारे यांनी केले यावेळी शैक्षणिक आणि अन्य उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुरुकुलमच्या विद्यार्थी- विद्यार्थिनींचा प्रशस्तीपत्र व बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला यशस्वी संस्थेचे मार्केटिंग अधिकारी प्रशांत कुलकर्णी, यशस्वी संस्थेचे ग्रंथपाल पवन शर्मा, यशस्वी संस्थेच्या ऑपरेशन विभागाचे अधिकारी दिलीप पवार, इम्रान वानकर, उमेश गुरव,भरत ईप्पर, ज्ञानेश्वर गोफण व योगेश रांगणेकर यांच्यासह शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.