मराठा चेंबर्स ऑफ काॅमर्सचे माजी अध्यक्ष दीपक करंदीकर ; द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया पुणे विभागाच्या हीरक महोत्सवानिमित्त पश्चिम विभागीय औद्योगिक प्रतिनिधी अधिवेशनाचे उद्घाटन

पुणे : जुन्या बँकिंग पद्धतीत जेव्हा संगणक आले तेव्हा नोकऱ्या गेल्या नाहीत. नोकरीचे स्वरूप बदलले. आज ग्राहकांची अपेक्षा वाढली आहे आणि भारतातले लोक जागतिक मानकांनुसार काम करायला तयार नाहीत. जागतिक पातळीवर आपल्याला अनेक दबावांना सामोरे जावे लागत आहे. स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर अद्ययावत राहणे गरजेचे आहे. खर्च व व्यवस्थापन लेखापाल (सीएमए) फक्त अकाउंटंट नसून डिजिटल तंत्रज्ञानात निपुण व्यवसायिक मार्गदर्शक असतो, असे मत मराठा चेंबर्स ऑफ काॅमर्सचे माजी अध्यक्ष दीपक करंदीकर यांनी व्यक्त केले.
द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया या देशातील अग्रगण्य संस्थेच्या पुणे विभागाच्या हीरक महोत्सवानिमित्त पश्चिम विभागीय औद्योगिक प्रतिनिधी अधिवेशनाचे उद्घाटन आयोजन कर्वेनगर येथील सीमए भवन येथे करण्यात आले होते. यावेळी करंदीकर बोलत होते. माजी अध्यक्ष सीएमए डॉ. धनंजय जोशी, इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया, पुणे शाखा अध्यक्ष निलेश भास्कर केकाण, केंद्रीय समिती सदस्य सीएमए नीरज जोशी, वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल माजी अध्यक्ष सीएमए चैतन्य मोहरीर, माजी केंद्रीय समिती सदस्य सीएमए संजय भार्गवे, इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया, पुणे शाखा माजी अध्यक्ष सीएमए नागेश भागणे, पुणे शाखा सदस्य सीएमए विश्वनाथ जोशी यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमात ६० हून अधिक ज्येष्ठ सीएमए यांचा सीएमए अचिव्हर्स म्हणून गौरव करण्यात आला. महाराष्ट्रासह गोवा, गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड येथील २०० हुन अधिक प्रतिनिधी उपस्थित होते.
दीपक करंदीकर म्हणाले, एआय, ऑटोमेशन, डेटा सायन्स मुळे डिजिटल युगात सीएमए ची भूमिका बदलते आहे. जो तंत्रज्ञानाचा स्वीकार करतो, डेटा विश्लेषण शिकतो तो पुढे जातो. काळाशी जुळून घ्या नाहीतर नष्ट व्हाल, हे सत्य आहे. सीएमएची भूमिका पूर्वी फक्त बजेटिंग, रिपोर्टिंग, कॉस्ट मॅनेजमेंट होती. आता ते व्यवसाय धोरणाचे भागीदार आहेत. त्यामुळे सतत शिकणे आणि सर्टिफिकेशन अद्यतन करणे आवश्यक आहे.
डॉ. धनंजय जोशी म्हणाले, प्रॅक्टिस करणारे सदस्य आणि उद्योगातील सदस्य यांच्यात एक प्रकारची दरी आहे. प्रॅक्टिस करणाऱ्यांबद्दल आणि उद्योगात काम करणाऱ्यांबद्दल काही पूर्वग्रह आहेत. दोघेही एकाच संस्थेचे सर्टिफाईड कॉस्ट अकाउंटंट्स आहेत तरी ही दरी आहे. ५०-५५ वर्षांपासून ही दरी कमी झालेली मला दिसली नाही. संस्थेतील तरुण लेखापालांनी ही दरी कमी होण्यासाठी प्रयत्न करावेत. उद्योगात काम करणाऱ्यांना वेळेची मर्यादा आहे तरीही पण संस्थेशी जोडलेले राहा, कृतज्ञ रहा. संस्थेला पैशाची नाही तर अनुभवाची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
अरिंदम गोस्वामी म्हणाले, आजचा काळ तंत्रज्ञानाचा आहे. डिजिटल परिवर्तनामुळे व्यवसायांचे स्वरूप बदलत आहे, आणि या बदलात खर्च व व्यवस्थापन लेखापाल यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची बनली आहे. सीमए केवळ आकड्यांवर आधारित निर्णय घेत नाहीत, तर ते नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून, व्यावसायिक धोरणे आणि निर्णय प्रक्रिया साधतात.
नीरज जोशी म्हणाले, द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स पुणे विभागाच्या वतीने एआय वर आधारित कोर्सेस सुरु करण्यात आली आहेत. उद्योग क्षेत्रातील सदस्यांनी त्यांच्या अनुभवाचे आदानप्रदान करण्याचे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.
देवदत्त केकाटपुरे, नीरज जोशी, हर्षद देशपांडे, मुकेश गुप्ता, ब्रिजेश माळी, आशिष देवडे, नीरज जंगीद, डॉ. मर्झुन जोखी, सुभेंदू चक्रवर्ती यांनी विविध सत्रात मार्गदर्शन केले. तसेच चर्चासत्रात सोमा घोष, श्रद्धानंद देसाई, अनिता खिस्ती, डॉ. अजय महाजन, विद्यासागर अप्पूकुटन, शिल्पा पारखी यांनी सहभाग घेतला. यावेळी चैतन्य मोहरीर यांनी प्रास्ताविकात एआय चे महत्व विशद केले. तर, मिहिर व्यास आशिष थत्ते यांनी मनोगत व्यक्त केले.