अविवेकी लोकांनी आपल्यावर युद्ध लादले भारतीय सैन्याचे माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे
द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया पुणे विभागाचा हीरक महोत्सव

पुणे : युद्ध ही कोणतीही रोमँटिक गोष्ट नाही, ना ती एखादी बॉलिवूडची चित्रपटाची कथा आहे. मृत्यू, निर्वासित समस्या, कुटुंबांचे विघटन असे अदृश्य पण खोल सामाजिक नुकसान युद्धामुळे होते. युद्ध आणि हिंसा याकडे शेवटचा उपाय म्हणूनच पाहायला हवे. अविवेकी लोकांनी आपल्यावर युद्ध लादले. युद्धासाठी आनंद व्यक्त करणे योग्य नाही. प्रत्येक समस्येचा पहिला उपाय संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच असावा. युद्धातून कोणाचाही खरा विजय होत नाही. शांतता हाच खरा विजय आहे, असे मत भारतीय सैन्याचे माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी व्यक्त केले.
द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया या देशातील अग्रगण्य संस्थेच्या पुणे विभागाच्या हीरक महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात नरवणे बोलत होते. एरंडवणे येथील डॉ. कलमाडी शामराव शाळेच्या शकुंतला शेट्टी आॅडिटोरियम मध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. किशोर पंप प्रायव्हेट लिमिटेड चे व्यवस्थापकीय संचालक किशोर देसाई, माजी अध्यक्ष सीएमए डॉ. धनंजय जोशी, इन्स्टिट्यूट आॅफ कॉस्ट अकाउंटंट्स आॅफ इंडिया (आयसीएमए) माजी अध्यक्ष सीएमए अमित आपटे, माजी केंद्रीय समिती सदस्य सीएमए संजय भार्गवे, इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया, पुणे शाखा अध्यक्ष निलेश भास्कर केकाण, केंद्रीय समिती सदस्य सीएमए नीरज जोशी, वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल माजी अध्यक्ष सीएमए चैतन्य मोहरीर आदी यावेळी उपस्थित होते.
मनोज नरवणे म्हणाले, संरक्षणासाठी किती खर्च करावा आणि शिक्षण, आरोग्य, स्वच्छता यांसाठी किती खर्च करावा हा वाद फार जुना आहे. संरक्षणातील खर्च ही उधळपट्टी नसून देशासाठी आवश्यक ‘इंश्योरेंस’ आहे. सज्ज लष्करामुळे संघर्ष टळतो आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळते. युद्ध महागडे असते त्याची नुकसान भरपाई खर्चिक असते. म्हणून ही गुंतवणूक देशाच्या सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक आहे.
युद्धानंतर भारतीय सैन्य नेहमीच शांततेकडे परतते आणि तसेच राहायला हवे. विशेषतः मातृदिनाच्या निमित्ताने हे सांगणे महत्त्वाचे आहे की कोणत्याही आईला आपले मुल युद्धात गमवावा लागू नये. आपण राष्ट्रीय सुरक्षेकडे बघताना बहुतांश वेळा ते केवळ लष्करी दृष्टिकोनातून पाहतो. तर आपापल्या क्षेत्रात काम करत असताना आपण सर्व जण देशाच्या सुरक्षेसाठी काही ना काही योगदान देतो.
किशोर देसाई म्हणाले, देशासाठी आपण छोट्या प्रमाणात का होईना, काही ना काही योगदान नक्की देऊ शकतो. सैन्याचा त्याग हा सर्वोच्च असतो, तो आपण करू शकणार नाही, पण त्यांच्या समर्पणातून आपण प्रेरणा नक्कीच घेऊ शकतो. व्यवसाय नेहमी एका स्वप्नातून सुरू होतो, आणि त्यातूनच त्याचा प्रवास घडू लागतो. सामाजिक कार्य करत राहा. फक्त बॅलन्स शीटचीच चिंता करू नका, असेही त्यांनी सांगितले.
सीएमए चैतन्य मोहरीर म्हणाले, सन १९६५ साली पुण्यात स्थापन झालेल्या या विभागाने आजवर ४० हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिले असून २२०० हून अधिक विद्यार्थी प्रमाणित कॉस्ट अकाउंटंट्स म्हणून घडवले आहेत. इन्स्टिट्यूट आॅफ कॉस्ट अकाउंटंट्स आॅफ इंडिया ही संस्था जागतिक स्तरावरील उद्योगांच्या आर्थिक नेतृत्वासाठी संसाधने आणि व्यावसायिकांची प्राधान्याने निवडलेली स्त्रोत संस्था असेल, हे संस्थेचे व्हिजन आहे, तर कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट व्यावसायिक जागतिक स्तरावर नैतिकतेने उद्योग चालवतील आणि धोरण, व्यवस्थापन व लेखा यांचे एकत्रित कौशल्य वापरून सामाजिक-आर्थिक संदर्भात भागधारकांसाठी मूल्यनिर्मिती करतील हे संस्थेचे ध्येय आहे, असेही त्यांनी सांगितले. निलेश केकाण यांनी प्रास्ताविक केले. नीरज जोशी यांनी संस्थेच्या हीरक महोत्सवी वर्षाच्या प्रवासाबद्दल माहिती दिली.