सुप्रसिद्ध भारतीय खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान लेखक डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन

पुणे -सुप्रसिद्ध भारतीय खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान लेखक डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी शांतपणे अखेरचा श्वास घेतला. डॉ. नारळीकर यांच्या निधनाने वैज्ञानिक आणि साहित्यिक विश्वात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. खगोलशास्त्रातील त्यांचे संशोधन आणि विज्ञानाचा सामान्यांपर्यंत प्रसार करण्याचे त्यांचे कार्य अविस्मरणीय आहे. डॉ. जयंत नारळीकर हे ‘हॉईल-नारळीकर सिद्धांत’ मांडणारे प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. ब्रह्मांडाच्या स्थिर स्थितीच्या सिद्धांताचे ते एक तज्ञ व्यक्तिमत्व होते.
*ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. विज्ञान विषयातला ज्ञानवृक्ष असेच नारळीकर यांचे वर्णन करावे लागेल. खगोलशास्त्रातील त्यांचे श्रेष्ठत्व आणि ज्येष्ठत्व जगमान्य आहे. रसाळ भाषेत मराठी विज्ञानकथा लिहून त्यांनी विज्ञानासारखा रुक्ष विषय सुबोध केला. केंब्रीज विद्यापीठात शिक्षण, टाटा मूलभूत संशोधन संस्थेत काम, आयुका संस्थेची उभारणी, २०२१ नाशिकमध्ये झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद असा त्यांच्या कार्याचा आवाका होता. त्यांच्या निधनाने ज्ञानवृक्ष उन्मळून पडला. हे महाराष्ट्राचेच नाही, तर देशाचे देखील अपरिमित नुकसान आहे. नारळीकर यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, ही प्रार्थना.*
*ॐ शांति!*
ना. चंद्रकांतदादा पाटील