ब्रेकिंग न्यूज़मनोरंजनमराठी

आत्मविश्वास कायम ठेवा, मोठी स्वप्ने पहा… अमेरिकेतील मराठी यशस्वी उद्योजक, लेखक, राजकारणी श्री ठाणेदार यांचा तरुणाईला सल्ला

विशेष कार्यक्रमात श्री ठाणेदार यांचा ‘लिव्हिंग लिजंड ऑनर’ पुरस्काराने सन्मान

Spread the love

पुणे : “कोणत्याही परिस्थितीत आत्मविश्वास कायम ठेवा. खचून जाऊ नका. चुकांची पुनरावृत्ती टाळा. उत्तम तयारी करा आणि योग्य तेवढा धोका जरूर स्वीकारा”, असा सल्ला ‘ही श्रींची इच्छा‌’ या गाजलेल्या आत्मचरित्राचे लेखक, यशस्वी मराठी उद्योजक, वैज्ञानिक आणि अमेरिकेतील यशस्वी राजकारणी आणि पहिले मराठी खासदार श्री ठाणेदार यांनी गुरुवारी (दि. २९) येथे तरुणाईला दिला.

महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळ, गर्जे मराठी ग्लोबल, पिंपरी-चिंचवड विद्यापीठ आणि रुरल आंत्रप्रिन्युअर कनेक्ट इनिशिएटिव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विषेश कार्यक्रमात ते बोलत होते. महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष सचिन ईटकर, कॉमसेन्स टेक्नॉलॉजीज्‌चे अध्यक्ष सागर बाबर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, माधव दाबके, नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर व्यासपीठावर उपस्थित होते.

टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला तरुणाईने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. अमेरिकेतील प्रभावशाली व्यक्तीमत्व म्हणून परिचित असणारे ठाणेदार हे अमेरिकेच्या संसदेतील पहिले मराठी खासदार असून मिशिगन हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचे सदस्य म्हणून कार्यरत होते. सध्या मिशिगनच्या १३व्या काँग्रेसनल जिल्ह्यातून प्रतिनिधी म्हणून ते कार्यरत आहेत.

श्री ठाणेदार यांच्या मनोगतातून उद्योग, व्यवसाय आणि भारत-अमेरिका यांच्यातील सध्याच्या संबंधातील काही मुद्द्यांवरही प्रकाश पडला. सचिन ईटकर यांच्या हस्ते श्री ठाणेदार यांचा ‘लिव्हिंग लिजंड ऑनर’ पुरस्कार देऊन विशेष सत्कार करण्यात आला. युवकांशी संवाद साधताना ठाणेदार यांनी स्वतःच्या जडणघडणीची माहिती दिली. सुरवातीच्या दोन नोकऱ्यांचा अनुभव, त्यानंतर उच्चशिक्षण, चार वेळा अमेरिकेचा व्हिसा नाकारला जाणे अशा विदारक अनुभवांतून अमेरिकेतील विद्यापीठात पुढील शिक्षण आणि नंतर उद्योजक म्हणून अत्यंत यशस्वी कारकीर्द, मंदीच्या काळात बुडालेला व्यवसाय, शून्यातून पुन्हा केलेली सुरुवात आणि घेतलेली गरुडभरारी हा त्यांचा प्रवास उपस्थितांसाठी प्रेरणादायी होता.

ठाणेदार म्हणाले, ‘माझी आई आणि अब्राहिम लिंकन हे माझे आदर्श आहेत. त्यांच्याकडून मी संस्कार घेतले. एका प्रयोगशाळेपासून मी उद्योजक म्हणून प्रवास सुरू केला आणि यश मिळविले. पण मोठ्या उद्योगांना लागणाऱ्या प्राथमिक घटकांवर माझा संपूर्ण व्यवसाय अवलंबून होता, याची जाणीव मला मंदीच्या काळात संपूर्ण व्यवसाय बुडाल्यावर झाली. पण मी खचून गेलो नाही. आधीच्या चुका परत करायच्या नाहीत, एवढे शिकलो आणि नव्याने व्यवसाय उभारले. त्यातही यशस्वी झालो. एका टप्प्यावर मला भौतिक यशाचे आकर्षण वाटेनासे झाले आणि मी समाजसेवा करण्याच्या हेतूने राजकीय क्षेत्रात प्रवेश केला, निवडणूक लढवली. तिथेही सुरवातीला अपयश आले पण मी प्रयत्न सोडले नाहीत. तयारी करून पुन्हा प्रयत्न केल्यावर यशस्वी ठरलो आणि आता खासदार या भूमिकेतून लोकांसाठी काम करण्याचे समाधान अनुभवत आहे. तरुणाईने स्वतःवर सदैव विश्वास ठेवून, पुन्हा पुन्हा प्रयत्न केले पाहिजेत. अपयशाने खचून न जाता, पुन्हा उभे राहिले पाहिजे’, असे ते म्हणाले.

ट्रम्प यांचे इमिग्रेशन धोरण विवाद्य

प्रेक्षकांमधून आलेल्या प्रश्नांनाही ठाणेदार यांनी उत्तरे दिली. ‘ट्रम्प यांचे इमिग्रेशनचे धोरण विवाद्य असून, त्याला सर्व स्तरांतून विरोध होत आहे. अमेरिकेतील बहुतांश तंत्रउद्योग बाहेरील कुशल मनुष्यबळावर अवलंबून आहेत. त्यामुळे ट्रम्प यांच्या धोरणाला देशातूनही विरोध आहे. पण सत्ता असल्याने ते इमिग्रेशन धोरण रेटून नेत आहेत’, असे ठाणेदार म्हणाले.

परदेशात जाण्याची गरज नाही भारतातच अनेक संधी उपलब्ध

भारताने नुकत्याच अवलंबिलेल्या ऑपरेशन सिंदूर संदर्भातील प्रश्नावर ठाणेदार म्हणाले, ‘हे युद्ध नव्हते आणि नाही. सर्जिकल स्ट्राईकचाच हा एक प्रकार होता. दहशतवादविरोधात कारवाई आवश्यकच होती. ती भारताने केली. ट्रम्प यांनी यामध्ये कोणतीही मध्यस्ती केली नाही. मी जेव्हा अमेरिकेत आलो, तो काळ खूप वेगळा होता. आता मी ठामपणे सांगतो, की भारताबाहेर जाण्याची गरज नाही. अनेक प्रकारच्या संधी देशातच उपलब्ध आहेत’, असेही ते म्हणाले.

सचिन ईटकर म्हणाले, ‘ठाणेदार यांचे जीवन म्हणजे तरुणाईसाठी प्रेरणा आहे. संघर्ष या संज्ञेला त्यांनी जणू अर्थ दिला आहे. आव्हाने आणि धाडस, यांचे दुसरे नाव म्हणजे ठाणेदार’, असे म्हणावे लागेल.

प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, ‘मराठी भाषा ही उद्योगाची भाषा झाली पाहिजे. त्यासाठी उद्योजकीय मानसिकता घडविण्याची आवश्यकता आहे. युवकांसमोर प्रेरणास्रोत असले पाहिजेत. हीरो आणि आयडॉल, यांच्यातील फरक त्यांनी समजून घेतला पाहिजे. ठाणेदार यांच्यासारख्यांची चरित्रे युवकांसमोर असली पाहिजेत. त्यासाठी साहित्य महामंडळाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील’.‘आत्मनिर्भर भारत’ या उपक्रमाअंतर्गत संरक्षण सामुग्री उत्पादन क्षेत्रासाठी योगदान देणारे उद्योजक गणेश निभे यांचा विशेष सन्मान श्री ठाणेदार यांच्या हस्ते करण्यात आला.माधव दाबके यांनी आभार मानले तर मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button