ओळख श्रीज्ञानेश्वरी मधील अध्यापकांची कार्यशाळा आयोजन

आळंदी केवळ आणि केवळ श्रीमाऊलींचे कृपाप्रसादाने पाच वर्षापूर्वी ओळख श्रीज्ञानेश्वरी परिवार स्थापन झाला. श्रीज्ञानदेवांच्या साहित्याचा वापर किंवा उपयोग हा विद्यार्थ्यांच्या मूल्यशिक्षणाकरिता सुरु करावा ह्या विचाराने श्रीज्ञानेश्वर शिक्षण संस्था, आळंदी देवाची येथे ४ थी, ५ वी, ६ वी साठी श्रीहरिपाठ सुरु करून झाला व त्याचबरोबर इयत्ता आठवीसाठी श्रीज्ञानेश्वरीमधील विद्यार्थ्यांचे संस्कार व मूल्यशिक्षणाचे विषय शिकवावयास सुरुवात झाली. त्याचे श्रेय श्रीज्ञानेश्वर विद्यालयास देत असताना आळंदीमधील ह. भ. प. डॉ सुभाष महाराज गेठे, भागवत साळुंखे, वासुदेव शेवाळे, उमेश बागडे यांनी पाच वर्षापूर्वी विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यास सुरुवात केली.
त्याचवेळी माऊली संस्थानचे तत्कालीन विश्वस्त श्री. योगेश देसाई, श्री. अभय टिळक, श्री. विकास ढगे, व्यवस्थापक श्री. ज्ञानेश्वर वीर यांनी उपक्रमास सर्व साहित्य दिले व विद्यार्थ्यांना ज्ञानेश्वरीमधील मूल्यशिक्षण देऊन त्याचबरोबर श्रीक्षेत्र आळंदी मधील ४० ते ५० महाराज स्वतः पुढे आले. त्यांनी आम्हांस जबाबदारी द्या म्हणाले. चमत्कार तर पुढे झाला. पंचक्रोशी, पुणे जिल्हा व जळगांव पर्यंत ओळख ज्ञानेश्वरी हा उपक्रम ९० शाळेपर्यंत पोहोचला.
श्रीमाऊली संस्थान पुढे आले. त्यांनी साहित्याबरोबर ज्ञानेश्वरीमधील मूल्यशिक्षण व
संस्कारांचे धडे हे पुस्तक निर्माण करून भाषा मंत्री उदयजी सामंत यांचे हस्ते प्रकाशन केले. श्रीज्ञानेश्वर संस्थानच्या प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, पालखी सोहळा प्रमुख डॉ भावार्थ देखणे, विश्वस्त अॅड. राजेंद्र उमाप, श्री. निलेश लोढे कबीरबुवा, अॅड. रोहिणी पवार, ह. भ. प. श्री. पुरुषोतमदादा पाटील या नवीन विश्वस्तांनी पुढाकार घेऊन ओळख श्रीज्ञानेश्वरी हे पुस्तक आदरणीय डॉ. गेठे, मा. भागवत साळुंखे, मा. शेवाळे ह्यांचे लेखणीमधून तयार झाले. त्याचबरोबर माजी विश्वस्त श्री. अभय टिळक यांनी अध्यापकांसाठीही एक पुस्तक लिहिले. २४ मार्च अखेर ९० शाळांमध्ये इयता ५, ६ साठी हरिपाठ पाठांतर, इयत्ता ७ वी साठी हरिपाठाचा अर्थ व इयत्ता आठवीसाठी ओळख ज्ञानेश्वरी मूल्यशिक्षण व संस्कार शिक्षण चालू आहे.
शिक्षण संस्थांना वेगळा वेळ न देता त्यांच्या कोणत्याही शैक्षणिक कार्यक्रमास धक्का न लावता व्यवस्था व व्यवस्थापन हा शिक्षकांचा कोणताही जास्त वेळ न घेता ऑफ पिरियड तासामध्ये शिक्षक गैरहजर असताना श्रीहरिपाठ व दर शनिवारी आनंददायी ओळख ज्ञानेश्वरी असा उपक्रम चालू आहे. हे होत असताना अनेक शाळांनी आपल्याच शिक्षकांमार्फत हा उपक्रम राबविण्यासाठी पाऊल उालले. त्याचा परिणाम माऊली संस्थान परिवाराने शाळेमधील शिक्षकांना हा उपक्रम व्यवस्थित विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी एक कार्यशाळा आयोजित केली आहे. सदर कार्यशाळा आळंदीत सोमवार दिनांक ९ जून २०२५ रोजी श्रीज्ञानेश्वर विद्यालय, आळंदी देवाची येथे होणार आहे.
त्याचबरोबर हा उपक्रम जूनपासून पैठण, नाशिक, नेवासा इथून सुरू व्हावा अशी शालेय संस्थांची मागणी होत आहे.
श्रीज्ञानेश्वरीमधील प्रगल्भ ज्ञानास स्पर्श न करता अभ्यास कसा करावा, श्रवण कसे करावे, बोलावे कसे, आईवडील व गुरुजनांविषयी माऊलींचे विचार व श्रीज्ञानेश्वरीमधील ज्ञान व विज्ञान संगत तसेच समाजशास्त्र, नागरिक शास्त्र इ. शाखांचे माऊलींचे विचार विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षणा बरोबर देण्यासाठी ओळख श्रीज्ञानेश्वरी परिवार प्रयत्नशील आहे.
आपणही प्रसिद्धीद्वारे सहकार्य करून ह्या उपक्रमास म्हणजेच श्रीमाऊलींचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविणेसाठी हा उपक्रम शाळांनी चालू करावा, कार्यशाळेसाठी शिक्षकांनी सहभागी व्हावे यासाठी सहकार्य करावे ही विनंती.