‘घुमंतु २५’ प्रदर्शनात फोटोंच्या माध्यमातून भटकंतीचा उत्सव
तब्बल ३५ फोटोग्राफर्सच्या १०४ फोटोंचा समावेश ; प्रदर्शनाला विनामूल्य प्रवेश

पुणे . जयपूरपासून ते तंजावर पर्यंत आणि महाराष्ट्रातील वानखेडे स्टेडियमसह विविध मंदिरे, प्रेक्षणिय स्थळे व ऐतिहासिक इमारतींसह निसर्गाचे प्रवासादरम्यान मोबाईलमध्ये टिपलेले सुंदर क्षण फोटोंच्या माध्यमातून पाहण्याची संधी पुणेकरांना मिळाली. घुमंतु २५ – स्वान्तस्सुखाय छायाचित्रणाय च… या प्रदर्शनांतर्गत ३५ निवडक फोटोग्राफर्सच्या १०४ अप्रतिम फोटो कलारसिकांना पहायला मिळत असून भटकंतीचा उत्सव साजरा होत आहे.
बालगंधर्व कलादालन येथे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. उद्घाटनप्रसंगी विवेक नारळकर, प्रसिद्ध फोटोग्राफर सतिश पाकणीकर, डॉ. रामदास महाजन यांसह फोटोग्राफर्स देखील यावेळी उपस्थित होते. एम्बी हॅली, वेरुळ, हंपी, जोधपूर, लखनऊ, पुण्यासह श्रीलंका, मॉरिशस, न्यूझिलंड, सिंगापूर येथे काढण्यात आलेले फोटो प्रदर्शनात आहेत.
प्रत्येकाचा प्रवास हा अनुभव समृद्ध करणारा असतो. कधी भव्य डोंगररांगा, कधी निळ्याशार समुद्राचे क्षितिज, तर कधी शहराच्या गजबजाटातले रंग प्रत्येक ठिकाण वेगळे दिसतात आणि त्याच्या अनमोल आठवणी. अशाच आठवणींना उजाळा देणारे आणि जगभरातील फोटोग्राफर्सच्या मोबाईलमध्ये टिपलेले अद्वितीय क्षण अनुभवण्याची संधी पुणेकरांना यानिमित्ताने मिळत आहे. विशेष म्हणजे, हे फोटोग्राफर्स विविध क्षेत्रात कार्यरत असलेले डॉक्टर, इंजिनिअर्स, गृहिणी, आयटी तज्ञ, विद्यार्थी आणि वैमानिक देखील आहेत. वयवर्षे २० ते ७७ या वयोगटातील आहेत.
घुमंतु मालिकेतील हे तिसरे पुष्प आहे. याआधी सन २०२२ आणि २०२३ मध्येही अशीच प्रदर्शने आयोजित करण्यात आली होती आणि त्यांना पुणे, मुंबई, सांगली, कोल्हापूर, नागपूर, बंगळुरू, कोचीन अशा अनेक शहरांमधून उत्तम प्रतिसाद मिळाला होता. हे प्रदर्शन दि. २७ मार्च पर्यंत बालगंधर्व कलादालन येथे सुरु असून सकाळी ११ ते ८ यावेळेत रसिकांना विनामूल्य पाहता येणार आहे. तरी पुणेकरांनी प्रदर्शनास आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.