अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत ईगल नाशिक टायटन्स संघाला विजेतेपद

पुणे, २२ जून २०२५: महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग(एमपीएल) २०२५ स्पर्धेत अतितटीच्या लढतीत अर्शिन कुलकर्णी(७७धावा) याने केलेल्या दमदार खेळीच्या जोरदार ईगल नाशिक टायटन्स संघाने रायगड रॉयल्स संघाचा ६ गडी राखून पराभव करत विजेतेपद संपादन केले.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत ईगल नाशिक टायटन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रायगड रॉयल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २०षटकात ४बाद १९०धावाचे आव्हान उभे केले. सलामवीर विकी ओस्तवाल(०)ला नाशिकच्या मुकेश चौधरीने पहिल्याच चेंडूवर झेल बाद करून संघाला पहिला धक्का दिला. पण त्यानंतर सिद्धेश वीर व हर्ष मोगावीरा यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७७ चेंडूत १११ धावाची शतकी भागीदारी करून संघाच्या डावाला आकार दिला. हर्ष मोगावीराने ३९चेंडूत ४८ धावांची खेळी करून सिद्धेश वीरला साथ दिली. हर्षने २चौकार व ३षटकार खेचले. त्याचे दोन धावांनी अर्धशतक हुकले. नाशिकच्या कौशल तांबेने हर्ष मोगावीराला झेल बाद केले. सिद्धेश वीरने ३८ चेंडूत ५० धावा करून आपले अर्धशतक साजरे केले. त्यानंतर सिद्धेश वीरने नीरज जोशीच्या समवेत तिसऱ्या विकेटसाठी २९चेंडूत ४५ धावाची भागीदारी करून संघाची धावगती वाढवली. नीरज जोशी २७ धावा काढून तंबूत परतला. नीरजने १चौकार व ३उत्तुंग षटकारांचा मारा केला. सिद्धेश वीरने ५९ चेंडूत नाबाद ९९ धावांची झंझावती खेळी केली. सिद्धेशने ११चौकार व ४उत्तुंग षटकार ठोकले.
१९१धावाच्या आव्हानाचा पाठलाग करताना ईगल नाशिक टायटन्स संघ ५ षटकात बिनबाद ४३ धावा सुस्थितीत असताना पाऊस सुरु झाला. अर्शिन कुलकर्णी व मंदार भंडारी या जोडीने ४२ चेंडूत ६२ धावांची सलामी दिली. मंदार भंडारीने २२चेंडूत २८धावा काढून बाद झाला. मंदारने ३षटकार खेचले. अर्शिनने आक्रमक खेळी करत ३४ चेंडूत आपले अर्धशतक साजरे केले. साहिल पारीख चोरटी धाव काढताना ७ धावांवर धावबाद झाला. पाठोपाठ रायगडच्या तनय संघवीने रोहन दामले(११)ला झेल बाद केले. यावेळी नाशिक संघाला विजयासाठी ३८ चेंडूत ७३ धावांची आवश्यकता होती. अर्शिनने ५३चेंडूत ७७धावांची सुरेख खेळी केली. त्याने ५चौकार व ४षटकार मारले. रायगडच्या तनयने अर्शिन(७७)ला धावांवर झेल बाद करून नाशिक संघाला मोठा धक्का दिला. नाशिकला विजयाचे समीकरण १४चेंडूत ३२ धावांची आवश्यकता होती. अथर्व काळेला दोनवेळा जीवदान मिळाले. १७.५ षटकात अथर्वला पहिल्याच चेंडूवर नीरज जोशीने जीवदान दिले. त्यानंतर १० धावांवर असताना अथर्वला अजय बोरुडेने पुन्हा जीवदान दिले व हा चेंडू थेट सीमारेषे पलीकडे गेला. रणजीत निकमने १३चेंडूत ३चौकार व २षटकाराच्या मदतीने नाबाद ३१ धावांची खेळी करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याला अथर्व काळेने ७ चेंडूत २३ धावांची धडाकेबाज खेळी करून साथ दिली. शेवटच्या षटकात ६ चेंडूत ६ धावा असे आव्हान असताना अथर्वने पहिल्याच चेंडूवर मारलेला चेंडू सिद्धेश वीरच्या हाताला लागून सीमा पार गेला व ईगल नाशिक टायटन्स संघाने १९.१ षटकात ४बाद १९१ धावा करून पूर्ण केले.
स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक व ५० लाख रुपये तर, उपविजेत्या संघाला करंडक व २५ लाख रुपये अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मानद सचिव अॅड. कमलेश पिसाळ, सहसचिव श्री. संतोष बोबडे, एमपीएलचे चेअरमन श्री. सचिन मुळे, तसेच अपेक्स कौन्सिल सदस्य श्री. शुभेंद्र भांडारकर, श्री. सुहास पटवर्धन, श्री. राजू काणे, श्री. सुनील मुथा, श्री. विनायक द्रविड, श्री. सुशील शेवाळे, श्री. रणजीत खिरीड, श्री. केशव वझे, श्री. अजय देशमुख, श्री. कल्पना तापीकर, सीईओ श्री. अजिंक्य जोशी, तसेच सर्व संघमालक, सर्व जिल्हा संघटनेचे सदस्य, क्रीडा, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
संक्षिप्त धावफलक
रायगड रॉयल्स: २०षटकात ४बाद १९०धावा(सिद्धेश वीर नाबाद ९९(५९,११x४,४x६), हर्ष मोगावीरा ४८(३९,२x४,३x६), नीरज जोशी २७(१८,१x४,३x६), मुकेश चौधरी २-४२, कौशल तांबे १-३६, प्रशांत सोळंकी १-४२) वि.ईगल नाशिक टायटन्स: १९.१ षटकात ४बाद १९१ धावा (अर्शिन कुलकर्णी ७७(५३,५x४,४x६), रणजीत निकम नाबाद ३१(१३,३x४,२x६), अथर्व काळे नाबाद २३, मंदार भंडारी २८, तनय संघवी २-३१, शुभम कदम १-२८); सामनावीर – रणजीत निकम