सामान्य व गरीब व्यक्तींच्या सुखान्ताचा ग्राफ वाढवावा_ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
श्री सरस्वती कराड हॉस्पिटलचे उद्घाटन

‘केअर’, ‘क्युअर’ व ‘हील’ तत्वांशी बांधिलकी असलेले हॉस्पिटल
पुणे : ” देशातील सामान्य व गरीब व्यक्तींच्या सुखान्ताचा ग्राफ वाढविणे अत्यंत गरजेचे आहे. सेवा परमोधर्म असून समाजातील शेवटच्या मानवापर्यंत ती पोहचवावी. सेवा आणि संस्काराच्या माध्यमातूनच गोरगरीब जनतेची सेवा करावी. या देशात विचार भिन्नता नाही तर विचार शुन्यतेची सर्वात मोठी समस्या आहे ”असे विचार केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
‘रूग्ण सेवा हीच ईश्वर सेवा’ या ब्रीदाला अनुसरून माईर्स एमआयटी शिक्षण संस्थेचे संस्थापक विश्वधर्मी प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड यांच्या मातोश्री स्वर्गीय सौ. सरस्वती कराड यांच्या स्मृती प्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या ‘श्री सरस्वती कराड हॉस्पिटल’ (एसएसकेएच)चे उद्घाटन फीता कापून केले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन व राज्यसभेच्या खासदार सौ. मेधा कुलकर्णी, जगप्रसिद्ध संगणक शास्त्रज्ञ डॉ.विजय भटकर हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा.कराड हे असतील.
तसेच, माईर्स एमआयटीचे संस्थापक विश्वस्त प्रा.पी.बी.जोशी, एमआयटी शिक्षण संस्थेच्या सहव्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. सुचित्रा कराड-नागरे, कार्यकारी संचालक डॉ. विरेंद्र घैसास, सौ. उषा विश्वनाथ कराड, एमआयटी एडीटीचे कार्याध्यक्ष डॉ. मंगेश तु. कराड, हभप तुळशीराम कराड आणि हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तुषार खाचणे उपस्थित होते.
नितीन गडकरी म्हणाले,”भविष्यातील व्हिजन अत्यंत महत्वाचे असून यामध्ये सरकारच्या भूमिकेबरोबरच समाजाने आता समाजासाठी कार्य करावे. स्वामी विवेकानंद म्हणायचे अंर्तआत्म्याच्या शोध घेतला की देव शोधायला कुठेही जावे लागत नाही. खरा धर्म हा मानवतेचा आहे. आईच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या या हॉस्पिटलमुळे परिवारावर झालेले संस्कार कळतात यामुळे गरीब व सामान्य जनतेची सेवा घडेल. ”
” आयुष्यमान योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारने गरीबांसाठी ५ लाख रुपयांपर्यताच्या उपचार सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सामाजिक संवेदनशीलता आणि जाणिव ठेऊन नागपूर येथे गरिबांसाठी सर्व वैद्यकीय सेवा अत्यंत माफक दरात उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामुळे त्यांचा आशिर्वाद लाभत आहे. आता १ हजार घरांचे स्मार्ट गांव बनविण्यात येत आहे. ५ लाख रुपयांमध्ये उपलब्ध घरांमध्ये पाणी आणि विज मोफत मिळणार आहे.”
” भारतीय संस्कृती विश्वशांतीसाठी कार्य करणारी आहे. सध्या जगात ज्या पद्धतीने संघर्ष सुरू आहे. अशावेळेस विश्वशांतीचा संदेश देऊन कल्याणकारी भूमिका भारताची आहे. मानवतेच्या आधारावर विश्वशांती स्थापीत व्हावी. वर्तमानकाळात आर्थीक विकास गरजेचा आहे परंतू साधन संपत्ती बरोबरच अध्यात्म ही महत्वाचे आहे. या देशाला विश्वगुरू बनण्याची ताकत आहे. असे ही नितीन गडकरी म्हणाले. ”
डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, ” रुग्ण सेवा करण्याचा पवित्र हेतू ठेऊन हॉस्पिटल माझ्या मातोश्रीच्या नावाने सुरू करण्यात आले आहे. सेवा भाव, समर्पण आणि त्याग या तत्वांच्या आधारे हे कार्य सिद्धीस प्राप्त झाले आहे. कोणतेही कार्य करण्यास आपण केवळ निमित्तमात्र असतो. त्यामुळेच आज जगातील सर्वात मोठा घुमट, बद्रीनाथ येथे सरस्वती मंदिर, स्वर्गारोहणाची निर्मिती करण्यात आली आहे.”
चंद्रकांत पाटील म्हणाले,” रुग्णसेवा ही सर्वात महत्वाची आहे. कोविडच्या काळात संपूर्ण जनतेला आम्ही चांगल्य आरोग्य सेवा पुरविली आहे. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी नागपूरला लोकसंख्येच्या दृष्टिने आरोग्य सेवा अधिक दिली आहे. त्या पद्धतीची सेवा आता पुण्याला मिळावी. यावरून पुणे शहराची ओळख सर्वदूर होईल.”
गिरीश महाजन म्हणाले,” रुग्ण सेवा व आरोग्य सेवा दिवसेनदिवस वाढतच आहे. अशा वेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ लाख रुपयांचा विमा दिला. सीएम कार्यालयातून पत्र दिल्यास २ लाख रुपयांचा चेक दिला जातो. शासन स्तरावर आरोग्य सेवेचे कार्य उत्तम सुरू आहे. अशातच सेवा भावाने सुरू करण्यात आलेले हे हॉस्पिटल सर्व गरीब जनतेला उत्तम आरोग्य सेवा पुरवतील.”
डॉ. विरेंद्र घैसास यांनी प्रत्येक रुग्णाची काळजीपूर्वक उपचार करून गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा पुरविणे, वैद्यकीय क्षेत्रातील अत्याधुनिक सुविधांच्या माध्यमातून उपचार करणे आणि मानवतेसाठी कार्य करण्याचे सांगितले. डॉ. सुचित्र कराड नागरे यांनी स्वागतपर भाषण करून माईर्स संस्थेने आरोग्य सेवेची मोठी जबाबदारी खांद्यावर टाकली आहे आणि ती पूर्णपणे योग्य रित्या पार पाडण्याचे आश्वासन त्यांनी दिले. सूत्रसंचालन डॉ. वैशाली कोरडे व डॉ. तुषार खाचणे यांनी आभार मानले.