मराठी

पनवेलकरांसाठी खुशखबर! शास्तीमाफीसाठी अभय योजना

२५ ते ९० टक्क्यांपर्यंत सवलत; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पाठपुराव्याला यश

Spread the love
पनवेल – मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल महापालिका हद्दीतील नागरिकांसाठी खुशखबर मिळाली आहे. मालमत्ताकरावरील शास्तीमाफीसाठी महापालिकेने अभय योजना जाहीर केली आहे. चार टप्प्यात ही योजना असून टप्प्यानिहाय २५ ते ९० टक्क्यांपर्यंत शास्ती (दंड) माफी मिळणार आहे. यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांनी केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. अभय योजनेचा नागरिकांना मोठा लाभ होणार आहे.
पनवेल महापालिकेची २०१६ मध्ये स्थापना झाली. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात कराची आकारणी झाली.  महापालिका स्थापन होण्यापूर्वी सिडकोच्या माध्यमातून कर आकारणी आणि वसुली केली जात होती. महापालिकेनेही कर आकारला. त्यामुळे कर वाढला. वाढीव कर भरण्यास नागरिकांनी विरोध दर्शविला. त्यामुळे मालमत्ता कराची थकबाकी वाढली. यातून मार्ग काढण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांनी पाठपुरावा केला. तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्रव्यवहार केला. त्यानुसार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नगरविकास विभागाचे सचिव गोविंदराज, स्थानिक आमदार, महापालिका प्रशासनाची बैठक झाली. यातून मार्ग काढण्यासाठी महापालिका प्रशासनाने निर्णय घेण्याचे आदेश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले होते. त्यानुसार केवळ एक वेळची विशेष आणि अंतिम बाब म्हणून महापालिकेकडून अभय योजना जाहीर करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांनी अभय योजना जाहीर केल्याची माहिती खासदार बारणे यांना पत्राद्वारे दिली आहे. त्यामुळे खासदार श्रीरंग बारणे यांनी केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश आले. अभय योजनेचा नागरिकांना मोठा लाभ होणार आहे.
खासदार बारणे म्हणाले, १८ जुलैपासून चार टप्प्यात या अभय योजनेची अंमलबजावणी सुरु होत आहे. १८ जुलै ते १५ ऑगस्ट २०२५ दरम्यान मालमत्ता कर भरल्यास शास्तीवर ९० टक्के माफी मिळेल. तर, १६ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट दरम्यान ७५ टक्के, १ सप्टेंबर ते १० सप्टेंबर दरम्यान ५० टक्के आणि ११ सप्टेंबर ते २० सप्टेंबर दरम्यान मालमत्ता कर भरणाऱ्या नागरिकांना शास्तीवर २५ टक्के सवलत मिळणार आहे. यामुळे नागरिकांनी मालमत्ताकराचा भरणा करावा. अभय योजनेचा लाभ घ्यावा. अभय योजनेमुळे मालमत्ताकराची वसुली मोठ्या प्रमाणात होईल. नागरिकांचा मालमत्ता कराचा प्रश्न सुटेल. महापालिकेस आर्थिक स्थिरता येईल. मालमत्ताकराची वसुली सुलभ, सुरळीत होईल. शहर विकासाला चालना मिळेल. त्यामुळे नागरिकांनी मालमत्ताकराचा भरणा करुन  अभय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने दिलासा दिला आहे. जनतेसाठी काम करणारे महायुतीचे सरकार असल्याचेही खासदार बारणे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!