धर्मब्रेकिंग न्यूज़मराठी

सावित्री-ज्योतिबाच्या काव्यरचनांनी चार दिवसीय दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलचे उद्घाटन

सावित्रीमाईच्या शेकडो लेकींनी केला संविधानाचा जागर

Spread the love

संविधान कट्ट्यावर फुलेप्रेमी कवी, संविधानदूत विजय वडवेराव यांच्या नेतृत्वात संविधानाचे वाचन

पुणे: अंगावर हिरवे इरकल, कपाळी आडवा गंध, हाती संविधान, ओठी सावित्री-ज्योतिचा जागर करत सावित्रीबाईंच्या पेहरावात अवतरलेल्या शेकडो लेकी, डोक्यावर फुले फेटा, अंगात कोट घालून महात्मा फुलेंच्या पेहरावात आलेले आयोजक विजय वडवेराव अन् सर्वांनी एकत्रितपणे केलेला संविधानाचा जागर, यामुळे संविधान कट्ट्यावर, सभागृहात जणू सावित्रीबाई, ज्योतिराव आल्याचे चित्र पाहायला मिळाले.
भिडेवाडाकार फुलेप्रेमी कवी, संविधानदूत विजय वडवेराव यांच्या संकल्पनेतून देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्यजागर अभियानांतर्गत दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलचे उद्घाटन मान्यवर कवींच्या अध्यक्षतेखाली झाले. येत्या ५ जानेवारी २०२६ पर्यंत हा फुले फेस्टिव्हल नवी पेठेतील एस. एम. जोशी फाउंडेशनच्या सभागृहात रंगणार असून, महाराष्ट्रासह देशविदेशातून ८०० कवी, साहित्यिक, विचारवंत, कलाकार यामध्ये सहभागी झाले आहेत.
महात्मा फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई व फातिमाबी शेख यांच्या वेशभूषेतील कवी-कवयित्रीनी सादर केलेल्या काव्यरचना, फुले दाम्पत्याचा गौरवपूर्ण उल्लेख, विचारांचा जागर, सावित्री-ज्योति यांच्यासह आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला.
क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात सुरु केलेल्या देशातील पहिल्या मुलींच्या शाळेचा इतिहास जतन व्हावा, फुले दाम्पत्याच्या कार्यकर्तृत्वाचा प्रचार व प्रसार व्हावा आणि हा इतिहास पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने या फेस्टिवलचे आयोजन केले आहे. देश-विदेशातील जवळपास आठशे कवींचा काव्य महोत्सव, भिडेवाडा या विषयावर मराठी गझल मुशायरा, एकपात्री प्रयोग, शालेय विद्यार्थ्यांच्या नाट्यछटा, एकांकिका, सांगितिक पोवाडे, महिला सक्षमीकरणासाठी लाठीकाठी, दांडपट्टा प्रात्यक्षिक असे विविध कार्यक्रम फेस्टिव्हलमध्ये होणार आहेत. लंडन, ऑस्ट्रेलिया, अबुधाबी आदी देशांतून, तसेच महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात, तेलंगणा, दिल्ली, राजस्थान, उत्तरप्रदेश आदी राज्यातून कवी-कवयित्री सहभागी झाले आहेत.
महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा त्याग, समर्पण आणि देशाच्या जडणघडणीतील योगदान अमूल्य आहे. ही एक चळवळ असून, फुले विचार पुढच्या पिढीमध्ये रुजवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. जिल्हास्तरावर, राज्यस्तरावर फुले दाम्पत्याचा कार्यजागर करणारे कार्यक्रम वर्षभर घेतले जातात. ज्यांनी कर्मठ व्यवस्थेच्या विरोधात जाऊन स्त्री शिक्षणाचा पाया रोवला, लोकांचा शिव्याशाप, चिखलफेक, शेणाचे गोळे अंगावर झेलले, त्याग व समर्पण भावनेने कार्य केले, त्या फुले दाम्पत्याला भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी अभियान राबवणार आहोत, असे वडवेराव म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!