हिंद-दी-चादर’ च्या माध्यमातून श्री गुरु तेग बहादुर साहिबांचा संदेश समाजात पोहोचविण्याचा प्रयत्न-हरजितसिंग बेदी

पुणे, दि. १४ फेब्रुवारी: श्री गुरु तेग बहादुर साहिबांच्या शिकवणी आणि त्यांचे हौतात्म्याची भावना भावी पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हिंद-दी-चादर’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे, या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कॅम्प येथील गुरुद्वारा गुरुनानक दरबारचे वरिष्ठ विश्वस्त हरजितसिंग बेदी यांनी दिली.
श्री. बेदी म्हणाले, साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त त्यांची शहीदी संपूर्ण मानवजातीच्या धार्मिक स्वातंत्र्यासाठी आणि सत्यासाठी होते. खारघर, नवी मुंबई येथे २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी ऐतिहासिक ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांना सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्याकरिता प्रशासन आणि सिख, सिकलीगर, लबाना, बंजारा, मोहयाल, सिंधी आणि गुरुनानक नाम लेवा संगत-समुदाय एकत्रितपणे जय्यत तयारी करीत आहे.
श्री गुरु तेग बहादुर साहिबजीचे त्याग, शौर्य व मानवतेचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करीत असल्याबद्दल श्री. बेदी यांनी राज्य शासनाचे आभार मानले.



