मनोरंजनमराठी

व्यक्त, अव्यक्ताचा अनोखा आविष्कार : ‌‘मिलाप – अ कपल ऑफ मेनी थिंग्ज‌’

कलासक्त कल्चरल फाऊंडेशन आयोजित कार्यक्रमास रसिकांची उत्स्फूर्त दाद

Spread the love

पुणे . तबला आणि नृत्य बोलांची संवादरूपी जुगलबंदी, ताल आणि नृत्यातून घेतलेला काव्याचा मागोवा, भाषेची सुंदर गुंफण करत नादात्मक काव्यनिर्मिती अशा अनोख्या संकल्पनेतून साकारलेल्या ‌‘मिलाप – अ कपल ऑफ मेनी थिंग्ज‌’चा अनोखा अविष्कार रसिकांना मोहित करून गेला.

कलासक्त कल्चरल फाऊंडेशनतर्फे आज (दि.5) या विशेष कार्यक्रमाचे आयोजन एस. एम. जोशी सभागृहात करण्यात आले होते. प्रसिद्ध तबलावादक निखिल फाटक आणि प्रसिद्ध कथक नृत्यांगना, अभिनेत्री शर्वरी जमेनिस यांनी कार्यक्रम सादर केला.

सुरुवातीस झपतालातील पेशकार सादर करताना शास्त्रीय संगीताचा गाभा असलेली उत्स्फूर्तता, अमूर्तता निखिल फाटक यांनी तबला वादनातून दर्शविली. त्यानंतर कथक नृत्य शैलीतील पेशकाराच्या अंगाने जाणारा थाट शर्वरी जमेनिस यांनी सादर केला. तालाशी एकरूप होत ध्यानधारणेचा आनंद देणारा हा थाट सादर करताना शर्वरी यांनी दागिन्यांच्या वैविध्यतेतून प्रेरणा घेऊन नृत्याविष्कार सादर केला. तीन तालातील काव्यमय बंदिशी सादर करत काही नृत्यरचना तर काही पढंत उलगडत नेले.

वाद्य, नृत्यबोल, पक्षांचा आवाज याचा संगम साधणारा ‌‘परमेलू‌’ हा प्रकार सादर करताना तिहाईतील बंदिश सादर करून रसिकांची मने जिंकली. रोजच्या आयुष्या घडणाऱ्या काही घटना, जसे आईने मुलाला भरविणे, तो खात नाही म्हणून तिचे रागविणे, पती-पत्नीचा संवाद दर्शविताना विलंबित, मध्य आणि द्रुत लयीतील बंदिश तसेच लहान मुलाचा खेळायचा हट्ट तर आईने अभ्यास करण्यासाठी धरलेला आग्रह अशा रचनाही नृत्य आणि तबल्याच्या बोलातून सादर झाल्या. पदन्यासातून काव्यात्मकता निर्माण करताना शर्वरी जमेनिस यांनी आपले नृत्यावरील प्रभुत्व दर्शविले.

कविराज भूषण यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील एक एक छंद, काव्य, त्याचा अर्थ समजावत वाचिक अभिनयातून साकारताना त्या काळाची सामाजिक परिस्थिती, कवी भूषण यांनी औरंजेबाच्या जुलमी कारभारावर केलेली टीका, वीररस निर्माण करणारे काव्य, छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य पाहून शिव-पार्वतीमध्ये घडलेला संवाद गायन आणि अभिनयातून त्यांनी साकारला. यास रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

कथा आणि काव्याची सांगड घालत महाभारतातील द्यूत खेळाच्या प्रसंगावर आधारित रचना साकारताना सध्याच्या सामाजिक परिस्थितीत महिलांच्या असुरक्षिततेवर भाष्य करत नृत्याविष्कार साकारत स्त्रीने सक्षम व्हावे हा संदेश अधोरेखित केला.

माणिकप्रभू यांनी रचलेल्या काव्यावर सादरीकरण करून महाराष्ट्राची लोककला दर्शविणारी लावणी शर्वरी यांनी सादर केली. ‌‘याद पिया की आए‌’ ही ठुमरी, ‌‘रंगी सारी गुलाबी चुनरिया रे‌’ ही होरी तर ‌‘बरसन लागे बदरिया रुमझुमके‌’ ही कजरी शर्वरी यांनी साभिनय नृत्याविष्कारातून सादर केली. अबोली देशपांडे (गायन), अमृता ठाकूरदेसाई (की-बोर्ड) यांनी साथसंगत केली.

व्यक्त आणि अव्यक्त काव्याचा मागोवा, नृत्य आणि तबल्याच्या परिभाषेतून रंगत जाणारा संवाद, बंदिशींचे उलगडत जाणारे सौंदर्य, कवी भूषण यांच्या काव्यरचना, लावणी, ठुमरी, होरी, कजरी यांच्या सादरीकरणाने कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला आणि रसिकांच्या पसंतीस उतरला.

कलासक्त कल्चरल फाऊंडेशनचे अध्यक्ष श्रीरंग कुलकर्णी आणि विनिता आपटे यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. कलाकारांचा सत्कार श्रीरंग कुलकर्णी, विनिता आपटे, माधुरी वैद्य, महेश गावसक र यांनी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button