संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी थांबणार बोपोडीत अधिक वेळ पुणेकरांसाठी आनंदाची बातमी!

पुणे.पंढरपूर वारी ही लाखो वारकऱ्यांची श्रद्धा, भक्ती आणि आस्था यांचा एक अलौकिक संगम आहे. याच वारीतील अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक असलेल्या जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान काहीच दिवसांवर येऊन ठेपले आहे.
प्रत्येक वर्षीप्रमाणे पालखी मार्गावर असणाऱ्या पुणे शहरात ही पालखी थोड्या वेळासाठी विसावा घेते. मात्र बोपोडी हा पुण्यनगरीचा प्रवेशद्वार असूनही, पालखी येथे फार कमी वेळ थांबत असल्याने खडकी, औंध, बोपोडी, बाणेर, रेंजहिल्स परिसरातील असंख्य भाविकांना तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेता येत नाही.
ही अडचण लक्षात घेता, पुणे शहराच्या मा. उपमहापौर सौ. सुनीता वाडेकर यांनी संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. जालिंदर महाराज मोरे यांना भेट देऊन, पालखी बोपोडीतील विसाव्याच्या ठिकाणी किमान वीस मिनिटे अधिक थांबवावी, अशी विनंती करणारे निवेदन देण्यात आले.
या विनंतीला मान देऊन ह.भ.प. जालिंदर महाराज मोरे यांनी तुकोबारायांची पालखी बोपोडी येथे २० ते २५ मिनिटे अधिक वेळ थांबेल, असे आश्वासन दिले. यामुळे परिसरातील हजारो भाविकांना वेळेत आणि शांततेत दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे, ही अत्यंत आनंदाची समाधानाची बाब आहे.
या शुभप्रसंगी संस्थानच्या वतीने उपमहापौर सौ. सुनीता वाडेकर यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी उपस्थित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते परशुराम वाडेकर, अविनाश कदम, ॲड. ज्ञानेश जावीर आणि इतर मान्यवर.
या निर्णयामुळे पालखी सोहळ्याचा पुणे शहरातील विसावा अधिक अध्यात्मिक, भक्तिपर आणि जनसामान्यांसाठी सुलभ होईल.
संत तुकाराम महाराजांचा कीर्तन परंपरेचा संदेश, वारकऱ्यांचा भक्तिभाव आणि वारीची परंपरा अशा स्वरूपात आणखी भव्य आणि लोकाभिमुख होईल, असा विश्वास आहे.