ब्रेकिंग न्यूज़मराठी

गांधी दर्शन’ शिबीराला चांगला प्रतिसाद 

Spread the love

पुणे.महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या संयुक्त विद्यमाने रविवारी कोथरूड येथील गांधी भवनमध्ये ‘गांधी दर्शन’ शिबीर उत्साहात पार पडले. सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत पार पडलेल्या या शिबिराला नागरिकांचा आणि विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद लाभला.या शिबिरात ज्येष्ठ विधितज्ञ अॅड. उल्हास बापट यांनी ‘न्यायपालिका व कार्यपालिका यांच्यामधील संघर्ष आणि सर्वोच्च न्यायालयाची भूमिका’ या विषयावर मौलिक विचार मांडले.मुक्त पत्रकार प्रशांत कदम यांनी ‘माध्यमांचा उन्माद आणि नवराष्ट्रवाद’ यावर स्पष्ट आणि परखड मांडणी केली. तर दिग्दर्शक मंजुल भारद्वाज यांनी ‘आस्था, श्रद्धा आणि संविधान’ या विषयावर प्रभावी भाष्य करत आजच्या समाजातील मूल्यांची चर्चा उपस्थितांसमोर मांडली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात महात्मा गांधींच्या विचारांची आजच्या काळातील आवश्यकता विषद केली.गांधी विचारांचे नव्या पिढीला मार्गदर्शन मिळावे आणि सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेत युवकांचा सहभाग वाढावा या उद्देशाने आयोजित हे शिबिर हे ‘गांधी दर्शन’ मालिकेतील २१ वे शिबिर होते.शिबिर यशस्वी होण्यासाठी एड. स्वप्नील तोंडे, तेजस भालेराव, एड. राजेश तोंडे, अप्पा अनारसे यांचे विशेष योगदान लाभले. अन्वर राजन,ज्ञानेश्वर मोळक,संदीप बर्वे, इब्राहिम खान, डॉ. श्रुती पानसे, संदीप देशपांडे आदी उपस्थित होते.

प्रा. उल्हास बापट म्हणाले, “सर्व जगाचा अभ्यास केला तर भारतातच लोकशाही व्यवस्थित टिकली आहे, असे मानले जाते. लोकशाहीवर संकटं येतात, पण त्या संकटांना उत्तरे दिली जातात आणि लोकशाही टिकते. भारतीय घटना जगातील सर्व चांगल्या गोष्टी घेऊन तयार झाली आहे. पंडित नेहरूंनी लोकशाहीची पाळेमुळे रुजवली. मात्र, आज भारतीय लोकशाही पार्लमेंटरी न राहता ‘प्राईम मिनिस्टर डेमोक्रसी’ झाली आहे. निवडणूक आयोग आणि माध्यमे कितपत स्वतंत्र राहिली आहेत, हे सर्वश्रुत आहे. आतापर्यंत पंतप्रधानांवर अंकुश ठेवायचे काम जनतेनेच केले आहे.सध्या नैतिकतेचा ऱ्हास झाला आहे. नोटा सापडल्या तरी न्यायाधीश काढले जात नाहीत.घटनात्मक बाबींच्या विषयावर सर्वोच्च न्यायालयाने 3 महिन्यात निकाल दिले पाहिजेत.”

मंजूल भारद्वाज म्हणाले,’ आपण भारतीय लोक आस्था, श्रध्दा बाळगून असतात,म्हणून आपल्याला प्रश्न विचारण्याची सवय नाही. प्रस्थापित व्यवस्थेला आपण प्रश्न विचारत नाही. प्रश्नांना सत्ता घाबरते,म्हणून प्रश्न विचारत राहिले पाहिजे. अंधविश्वास ठेवता कामा नये.विवेकबुद्धी प्रमाण मानली पाहिजे.

प्रशांत कदम म्हणाले,’माध्यमांचा अतिरेकीपणा हा आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये सुद्धा अडथळा ठरत आहे. माध्यमांनी ऑपरेशन सिंदूर चे वार्तांकन करताना तारतम्य बाळगले नाही. त्याचा त्रास भारतीय लष्कराला झाला. मुख्य प्रवाहातील बर्‍याच माध्यमांनी पाकिस्तान आणि मुस्लिम यांतील फरक सुद्धा समजून घेतला नाही. आज जागतिक स्तरावर भारत आणि पाकिस्तान यांची नावे एकत्र घेतली जात आहेत, हे आपल्यासाठी निंदनीय आहे. खरेतर आपण पाकिस्तान पेक्षा वेगळे आहोत, याचा विचार करून आपल्या माध्यमांनी भूमिका घ्यायला हवी.

2014 पासून माध्यमांत नवराष्ट्रवाद फोफावतो आहे. जे काही घडतेय ते गेल्या 70 वर्षांत प्रथमच घडतेय असे सांगितले जाते आहे.’

शिबिरादरम्यान सत्य, अहिंसा, सामाजिक बांधिलकी आणि स्वावलंबन या गांधी विचारसरणीच्या मूलभूत तत्त्वांवर सखोल संवाद झाला. युवक-युवतींसाठी प्रेरणादायी ठरलेल्या या शिबिरात विविध सत्रांमधून गांधीवादाची आधुनिक संदर्भातील उपयुक्तता अधोरेखित करण्यात आली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button