पालखी सोहळ्यावर ४२ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर ,देहूनगर पंचांयत सज्ज

देहूगाव :(बद्रीनारायण घुगे ) : जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याच्या अनुषंगाने ,देहूनगर पंचायतीच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे.महत्वाच्या ठिकाणी ४२ सीसीटीव्ही बसवण्यात आले असून जवळपास ठिकाणी मनोरे उभे करण्यात आले असून त्यांच्या माध्यमातून पालखी सोहळ्यावर बारीक सारीक नजर राहणार आहे.त्यामुळे चोऱ्यामर्या होण्याचे प्रमाण नगण्य होणार आहे.देहूगाव मुख्य मंदिर ते गाथा मंदिर ,परंडवाल चौक ,बायपास रस्ते अशा ठिकाणी लाऊड स्पीकर कर्णे बसवण्यात आले आहेत.त्या माध्यमातून वारकरी भाविक भक्तांना काही अडचण निर्माण झाली ,पोलीस प्रशासनाची मदत हवी असेल तर तत्काळ पुकारले जाणार आहे.नदीच्या घाटावर महिलांसाठी तीन ठिकाणी चेंजिंग रूम तयार करण्यात आले आहेत.तर इंद्रायणीच्या घाटावर रात्रीच्या वेळी प्रकाश असावा यासाठी चार ठिकाणी तसेच देहूतील महत्वाचे चौक आशा ठिकाणी हाय मास दिवे बसवण्यात आले आहेत. तर रस्त्याच्या कडेला असणारे विद्युत दिवे देखील बसवण्यात आले आहेत .त्यामुळे रात्रीच्या वेळी सर्व देहूनगर पंचायतीच्या हद्दीतील रस्ते तसेच इंद्रायणी नदीच्या घाटावर लखलखाट असणार आहे.पिण्याच्या पाण्याची सुविधा देण्यासाठी ३० पाण्याच्या टँकरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.त्यात पीडब्लूडी चे ५ जिल्हा परिषद चे २५ आणि अन्य असे ३० पाण्याच्या टँकर ची व्यवस्था करण्यात आली आहे.तर १२०० पैकी ८०० फिरते शौचालये महत्वाच्या ठिकाणी बसवण्यात आले असून २०० शौचालये राखीव ठेवण्यात आली आहेत.
देहूतील इंद्रायणी घाट ,रस्ते पाण्याने धुवून स्वच्छ करण्यात आले आहेत. रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्याचे आणि साईट पट्टे भरण्याचे काम देखील युद्ध पातळीवर सुरू आहे.
वारकरी भाविक भक्तांना कोणत्याही आजारांना सामोरे जावे लागू नये यासाठी ठिक ठिकाणी अन्न सेवन करताना ,पाणी पिताना कोणती काळजी घ्यावी या बाबत सूचना फलक लावण्यात आले आहेत.
देहूनगर पंचायतीने स्वच्छतेला अधिक महत्व दिले असून देहूनगर पंचायतीचे ६३ आणि इतर जादा असे ८८ कर्मचारी ११ घंटा गाड्या ,आणि ४ ट्रॅक्टरच्या माध्यमातून दिवस रात्र स्वच्छता करण्यात येत आहे. एकूणच संत तुकाराम महाराज ३४० व्या आषाढी पायी वारीच्या अनुषंगाने देहूनगर पंचयतीच्या वतीने सर्वोतोपरी तयारी करण्यात आली असून वारकरी भाविक भक्तांच्या स्वागता साठी देहूनगर पंचायत सज्ज झाली आहे.देहूनगर पंचायतीचे मुख्याधिकारी ,इतर विभागाचे अधिकारी ,कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेऊन वारकरी भाविक भक्तांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी झटत आहेत.