एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणेतर्फे ‘यूपीएससी-२०२४ यशस्वितांचा १५वा राष्ट्रीय पातळीवरील सत्कार सोहळा १२ जुलै रोजी
यूपीएससी-२०२४ मध्ये भारतातून सर्वप्रथम आलेली-शक्ती दुबे

सर्वीस ओरिएंटेशन प्रोग्रॅमचे ही आयेाजन
पुणे, ९ जुलैः एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट (मिटसॉग) आणि डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसी यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) स्पर्धा परीक्षा-२०२४ मधील यशस्वितांच्या १५ व्या राष्ट्रीय सत्कार सोहळ्याचे आयोजन शनिवार, १२ जुलै रोजी स.९.३० वा. कोथरूड येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्वामी विवेकानंद सभागृहात आयोजन करण्यात आले आहे.
देशातून प्रथम आलेली शक्ती दुबे आणि तिसरा आलेला अर्चित डोंगरे यांच्यासह इतर यशस्वितांना गौरविण्यात येणार आहे. यूपीएससी मध्ये भारतातून प्रथम येणार्यास शाल, ज्ञानेश्वरांची प्रतिमा व सन्मानपत्र व १ लाख रूपये रोख देण्यात येणार आहेत. तसेच तृतीय क्रमांकास-३० हजार रूपये रोख देण्यात येतील. यावेळी १३० ते १४० हून अधिक यशस्वीतांचा सत्कार करण्यात येणार आहे.
या समारंभासाठी लोकसभेच्या पहिल्या महिला महासचिव स्नेहलता श्रीवास्तव, मुंबई येथील माजी पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर आणि सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकादमीचे माजी संचालक ए.एस.राजन हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे असतील. यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्वनाथ कराड यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
तसेच, ११ जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या सर्वीस ओरिएंटेशन प्रोग्रॅम एमआयटी डब्ल्यूपीयूच्या द्रोणाचार्य इमारतमध्ये होणार आहे. यावेळी मुंबई येथील माजी पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर, सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकादमीचे माजी संचालक ए.एस.राजन, छत्रपती संभाजीनगर येथील राज्य टॅक्स विभागाचे सह आयुक्त अभिजित राऊत, पटकथालेखक संचालक आदित्य भसीन, बीएमसीचे अतिरिक्त मनपा आयुक्त अभिजीत बांगर आणि आय-टेकचे मुख्य कार्यकारी व व्यवस्थापकीय संचालक अशिम पाटील आणि १३० ते १४० हून अधिक यूपीएससी-सीएसई २०२४ पात्रता उपस्थित राहणार आहेत. त्याच प्रमाणे शक्ती दुबे व अर्चित डोंगरे यांची प्रमुख उपस्थित राहणार आहे.
यूपीएससी स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना या टॉपर्सशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटीद्वारे आयोजित अशा या आगळ्यावेगळ्या सोहळ्याचे यंदा १५वें वर्ष आहे.
सकाळी ११.३० वा. एमआयटी डब्ल्यूपीयू कॅम्पस, कोथरूड, पुणे येथे होणार असून या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी सर्व टॉपर्सचा परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.
प्रशासनामध्ये काम करीत असताना अनेक प्रलोभने सामोरी येतात, त्यांना बळी न पडता देशापुढे चांगल्या कारभाराचा आदर्श कसा ठेवावा, चांगले प्रशासन कसे असते, हे या स्नातकांना समजावे; त्यासाठी या क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव घेतलेल्या प्रशासकीय अधिकार्यांचा आदर्श त्यांच्यासमोर ठेवावा आणि त्यांच्यावर जनहिताचे चांगले संस्कार व्हावेत, हा या कार्यक्रमाच्या पाठीमागचा हेतू आहे. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, चंडीगड, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, केरळ, ओरिसा, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, दिल्ली, छत्तीसगड, हरियाना, सिक्कीम, नागालँड आदी भारताच्या सर्व राज्यातील आयएएस, आयपीएस, आयआरएस व इतर केंद्रीय सेवेमधील यशस्वी झालेल्या १३० ते १४० विद्यार्थ्यांनी या समारंभास हजर राहण्यास संमती दिली आहे.
या सेवेत प्रवेश करणारे हे विद्यार्थी भारताच्या प्रशासकीय सेवेचा महत्वाचे अधिकारी म्हणून भाग होणार आहेत. प्रशासकीय सेवा, विधिमंडळाने पारित केलेले कायदे हे योजना आणि धोरणांच्या अंमलबजावणीमध्ये महत्वाची भूमिका बजावत असते. अशा विद्यार्थ्यांचे कौतुक करावे आणि त्यांचा सत्कार करावा, त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा द्यावी, या हेतूने त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
भारतातील, तसेच, महाराष्ट्रातील यूपीएससी-एपीएससी परिक्षार्थींना या यशस्वितांचे मार्गदर्शन मिळावे, तसेच, त्यांच्याशी सुसंवाद साधता यावा ही या कार्यक्रमाच्या आयोजनामागील प्रेरणा आहे. या मार्गदर्शनातून प्रेरणा घेऊन अनेक विद्यार्थी या स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी व्हावेत हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी ही आध्यात्मिक व सामाजिक स्तरावर काम करीत आहे. त्याचप्रमाणे एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट ही राजकीय नेतृत्वाचे प्रशिक्षण देणारी भारतातीलच नव्हे, तर आशिया खंडातील एकमेव अशी संस्था चालविली जात आहे. सामाजिक बांधिलकीचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून यूपीएससीमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय पातळीवर सत्कार करण्याचा संस्थेचा मानस आहे.
अशी माहिती एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड कॉमर्सच्या डीन डॉ. अंजली साने आणि मीटसॉगच्या जर्नल व रिर्सचचे प्रमुख डॉ. परिमल माया सुधाकर यांनी दिली आहे.