पुणे शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये भुयारी मार्गांची उभारणी – महापालिका आयुक्त
वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी दीर्घकालीन नियोजनावर काम सुरू, वर्षभरात सकारात्मक परिणाम; महापालिका आयुक्तांनी व्यक्त केला विश्वास

कसबा मतदारसंघात पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यासाठी आमदार हेमंत रासनेंसह महापालिका आयुक्तांचा पाहणी दौरा
पुणे : शहराच्या मध्यवर्ती भागात भुयारी मार्गांची उभारणी प्राधान्याने करण्यात येणार असून, रस्त्यांवरील खड्डे, वाहतूक कोंडी तसेच नागरिकांच्या येणाऱ्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महापालिकेकडून ठोस पावले उचलली जात आहेत. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी त्वरित करता येणाऱ्या उपाययोजना तसेच दीर्घकालीन नियोजन या दोन्ही पातळ्यांवर काम सुरू आहे. रखडलेली रस्त्यांची कामे वेगात पूर्ण करणे, फुटपाथ अतिक्रमणमुक्त करणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याची माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली आहे. येत्या वर्षभरात याचे सकारात्मक परिणाम नागरिकांना दिसून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधांचा आढावा तसेच कसबा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या समस्यांची पाहणी आमदार हेमंत रासने यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केली. यावेळी आयुक्तांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी, पोलिस उपायुक्त झोन १ ऋषिकेश रावले, रस्ते विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर, घनकचरा विभागाचे संदीप कदम, पाणीपुरवठाचे नंदकुमार जगताप, महावितरणचे काकडे, कसबा मंडलाध्यक्ष प्रशांत सुर्वे, अमित कंक, छगन बुलाखे यांच्यासह इतर प्रशासकीय अधिकारी. सर्व माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार हेमंत रासने म्हणाले, पुणे शहरातील गणेशोत्सव हे जगभरातील नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे. यंदा राज्य सरकारकडून गणेशोत्सवाला महाराष्ट्र राज्याचा महोत्सव म्हणून मान्यता देण्यात आली. यंदा हा उत्सव आणखीन भव्य स्वरूपात साजरा केला जाणार आहे. त्यामुळे येणाऱ्या भक्तांच्या सुविधेसाठी पायाभूत सुविधा सुसज्ज असणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांच्यासोबत आढावा घेण्यात आला. कसबा मतदारसंघातील वाहतूक कोंडीची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी भुयारी मार्गांच्या प्रस्तावावर राज्य सरकार सकारात्मक असून शनिवारवाडा ते स्वारगेट आणि सारसबाग ते शनिवारवाडा भुयारी मार्गांचा प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात आला आहे.