पावसाळा सुरू होताच केस गळायचे प्रमाण का वाढते आणि तज्ज्ञ यासंदर्भात काय सल्ला देतात?

पावसाळा सुरू झाला की वातावरण प्रसन्न होतं, हिरवागार निसर्ग मन मोहून टाकतो. पण याच ऋतूमध्ये केस गळतीची समस्या अनेकांना त्रास देऊ लागते. यामागचं खरं कारण म्हणजे पावसाळ्यात हवेतील आर्द्रता मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे टाळूवर अधिक घाम येतो आणि कोंडा, बुरशी, खाज व जळजळ यांसारख्या समस्या निर्माण होतात. परिणामी केसांची मुळे कमकुवत होऊन केस गळण्याचं प्रमाण वाढू शकतं.
अनेकांचा असा समज असतो की पावसाचं पाणी केसांसाठी फायदेशीर असतं. मात्र, प्रत्यक्षात पावसाचं पाणी अनेकदा आम्लयुक्त असतं आणि त्यामध्ये वातावरणातील धूळ, धूर व इतर प्रदूषक मिसळलेले असतात. त्यामुळे ते केस आणि टाळूच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. याशिवाय, या काळात शरीरातील प्रथिने आणि इतर आवश्यक पोषक घटकांची कमतरता, सततचा घाम आणि दूषित पाण्याचा संपर्क यामुळेही केस गळण्याची समस्या वाढू शकते. मात्र, घाबरण्याचं कारण नाही. पावसाळ्यात होणारी केस गळती बहुतांश वेळा तात्पुरती असते. योग्य आहार, स्वच्छता, केसांची योग्य निगा आणि नियमित दिनचर्या पाळल्यास ही समस्या हळूहळू कमी होऊ शकते.
पण केवळ वरवरची काळजी घेऊन पावसाळ्यातील केस गळती थांबणार नाही; त्यासाठी तुम्हाला काही प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या लागतील. पावसाळ्यात दमट हवामानामुळे डोक्यात बुरशी किंवा मुरुम होण्याची शक्यता असते. त्यामुळे टाळू नेहमी स्वच्छ ठेवणे हे केस गळती रोखण्याचे पहिले पाऊल आहे. केसांच्या मुळांपर्यंत पोषण पोहोचवण्यासाठी नियमितपणे हलक्या हाताने तेल लावा. केस धुण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने तुमच्या केसांनुसार सौम्य शॅम्पू वापरा. शक्य असल्यास हेअर प्रोडक्ट्सचा वापर टाळा किंवा अत्यंत कमी प्रमाणात करा. रसायने असलेले स्टायलिंग स्प्रे, जेल किंवा कंडिशनर्सचा वापर शक्यतो टाळा. कारण हेअर प्रोडक्ट्स आणि घाम एकत्र आल्यास टाळूवर घाण साचते, ज्यामुळे त्वचेची जळजळ होऊन केस मोठ्या प्रमाणावर गळू लागतात.



