डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन प्रशाला माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात साजरा

पुणे : बोपोडी येथील डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन प्रशाला विद्यालयातील सन १९९१-९२ मधील दहावीच्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा हॉटेल राधाकृष्ण वर्ल्ड ऑफ व्हेज, पिंपळेगुरव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
प्रथम सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनीं त्यांच्या विनंतीस मान देऊन कार्यक्रमास आलेल्या रजनी कर्णे, रंजना टंकसाळे, इंदिरा नागपुरे, रेहाना इनामदार (शेख), सुमित्रा स्वामी, डॉ. प्रफुल्लचंद्र चौधरी, कमलाकर पाटील, डॉ. अजयकुमार लोळगे, सीताराम वाघ, विश्वंभर हजारे, रामदास पोखरकर, देविदास सरोदे, दिलीप काटे, सोमा घुटे या सर्व शिक्षकांचे औक्षण, फुलांचा वर्षाव करून व फेटे बांधून व्यासपीठापर्यंत त्यांचे स्वागत करून त्यांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून स्वागतगीत गावून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
सुरुवातीला दिवंगत शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनींना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. साईनाथ गायकवाड यांनी केली. त्यानंतर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता कुरणे यांनी केले. यावेळी विद्यार्थी परिचया मध्ये ३३ वर्षांनी माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी पैकी अनेक विद्यार्थी आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये यशस्वीरित्या विविध क्षेत्रांमध्ये उच्च पदांवर कार्यरत आहेत. म्हणजे कोणी डॉक्टर, वकील, शिक्षण क्षेत्रात कोणी मुख्याध्यापिका, शिक्षिका, सिविल इंजिनीयर, बँकिंग क्षेत्रात काही खाजगी कंपनीमध्ये उच्चपदस्थ काहींनी स्वतःच्या उद्योग क्षेत्रामध्ये आपले नाव लौकिक केलेले शेवटी प्रशांत निघोजकर हा चित्रपट सृष्टी मध्ये पटकथा लेखक/दिग्दर्शक असल्यामुळे संपूर्ण कार्यक्रमाचे चित्रीकरण त्याने केले. विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्वांनी शिक्षकांना आपला परिचय करून देत शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला.
दिवसभरात आपल्या सहविद्यार्थी असलेल्या प्रत्येकाविषयी माहिती जाणून घेतली व जीवनातील एक सोनेरी क्षणांचा आनंद आठवणीत साठविला. प्रत्येक विद्यार्थी मनोगत व्यक्त करताना ३३ वर्षांनी आठवण ताजी करून प्रत्येक जण भाव विभोर झाले. आठवणींच्या पडद्याआड गेलेले आपले वर्ग मित्र-मैत्रिणी भेटल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. त्यावेळी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देताना सर्वांचे डोळे आनंदाश्रुंनी पाणवले होते. शेवटी स्नेह मेळावा कमिटी अध्यक्ष सौ. सुरेखा जाधव (गायकवाड) यांनी भाषण केले. श्री. नंदू लोंढे यांनी मान्यवरांचे आभार मानले.
तदनंतर मान्यवर शिक्षकांचा प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनींच्या हस्ते आदरपूर्वक सत्कार करण्यात आला. प्रत्येक शिक्षकांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांचे शाळेतील किस्से सांगितले काहींनी हुशार विद्यार्थ्यांचा उल्लेख व कौतुक करत त्याचबरोबर खोडकर विद्यार्थी विद्यार्थिनींचे गमतीदार प्रसंग सांगून वातावरण हास्यमय करून टाकले. शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष टंक साळे मॅडम यांनी आपल्या भाषणात जीवनात यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचे तोंड भरून कौतुक व अभिनंदन देखील केले. तसेच हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने यशस्वी करून दाखवणाऱ्या कमिटीचे व त्यांना मोलाची साथ देणाऱ्या विद्यार्थी- विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.
या स्नेह मेळाव्याला ५० पेक्षा अधिक विद्यार्थी विद्यार्थिनींनी हजेरी लावली. स्नेहभोजनानंतर दुपारी ४:०० वाजता सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी आपल्या शाळेच्या दिशेने बोपोडी येथे रवाना झाले. आपल्या शाळेत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन प्रशालेमध्ये पोहोचतात सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी आपल्या क्लासरूम मध्ये गेले. त्या ठिकाणी श्री. पाटील सर यांनी सर्व विद्यार्थ्यांचा तास घेतला. तास संपल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी वरंड्यामध्ये आपण आणलेले डब्यातील खाऊ खाण्याचा आनंद घेतला. तदनंतर सर्वांनी शाळेच्या प्रांगणामध्ये डॉज बॉल व क्रिकेटचा आनंद लुटला. शेवटी विद्यार्थिनींच्या संगीत खुर्चीने रंगत वाढवली व अशाप्रकारे कार्यक्रमाचा शेवट झाला. शेवटी निरोप घेताना गळाभेटीच्या वेळी प्रत्येक विद्यार्थी-विद्यार्थिनींचे डोळे पानावले आणि आपण सर्व मित्र-मैत्रिणी पुन्हा भेटू हे वचन देऊन आपापल्या ठिकाणी मार्गस्थ झाले.



