ब्रेकिंग न्यूज़मराठीमहाराष्ट्रशहर

​’हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त पुणे विभागात विविध कार्यक्रमांचे आयोजन

'हिंद-दी-चादर' निमित्त आयोजित उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे- विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

Spread the love

​पुणे, दि. १७: श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० वे शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त राज्य शासनाच्या वतीने ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमांतर्गत पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये विविध उपक्रम आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिली आहे. या उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असेही आवाहन त्यांनी केले आहे.

​श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांनी धर्मस्वातंत्र्य आणि मानवी हक्कांसाठी दिलेले अभूतपूर्व बलिदान आणि त्यांचे विचार जनसामान्यांपर्यंत, विशेषतः तरुण पिढीपर्यंत पोहोचवणे हा या आयोजनाचा मुख्य उद्देश आहे. पुणे विभागातील पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली या पाचही जिल्ह्यात शैक्षणिक उपक्रम, आरोग्य पंधरवडा, स्वच्छता व जनजागृती तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम आदींचे आयोजन करण्याच्या सूचना डॉ. पुलकुंडवार यांनी दिल्या आहेत.

​याअंतर्गत सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये निबंध, वक्तृत्व आणि चित्रकला स्पर्धा, प्रभात फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध गायक सतिंदर सरताज यांनी गायलेले भक्तीगीत शाळा आणि सार्वजनिक ठिकाणी ऐकवले जाणार आहे. श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या जीवनावरील माहितीपट शाळा व सार्वजनिक ठिकाणी दाखवले जाणार आहेत. शाळा, महाविद्यालये आणि संस्थांनी त्यांच्या उपक्रमांची माहिती आणि जिओ टॅग केलेले फोटो शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://gurutegbahadurshahidi.com अपलोड करणे आवश्यक आहे.

​१० फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत संपूर्ण विभागात ‘आरोग्य पंधरवडा’ राबवला जात असून, ठिकठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली आहेत. ग्रामपंचायत आणि नगरपालिका क्षेत्रांत विशेष स्वच्छता मोहिमा, प्रभात फेऱ्या आणि विशेष ग्रामसभांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे.

​या ऐतिहासिक सोहळ्यात शीख, सिंधी, बंजारा लबाना, सिकलीकर, मोहियाल, वाल्मिकी, उदासीन आणि वारकरी संप्रदायांसह सर्व सामाजिक संस्थांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे तसेच त्याची माहिती संकेतस्थळावर अपलोड करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले आहे.

​नवी मुंबई (खारघर) येथे होणाऱ्या मुख्य राज्यस्तरीय सोहळ्यासाठी जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनातर्फे विशेष बस सेवेचे नियोजनही करण्यात येत आहे, असेही विभागीय आयुक्तांनी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!