पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व्यापक चळवळीची गरज
संजय आवटे यांचे प्रतिपादन; ग्रीन सोल्युशन्सतर्फे डॉ. प्रसाद जोशी, आरती भोसले यांचा सन्मान
पुणे, ता. २४: “पर्यावरणाचे रक्षण ही केवळ शासनाची किंवा काही संस्थांची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. निसर्ग टिकला तरच मानवजातीचे भविष्य सुरक्षित राहील. त्यामुळे निसर्गाप्रती प्रत्येकाने संवेदनशील भावनेतून योगदान देत पर्यावरण संवर्धनाचे काम करावे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते व ‘नाम’ फाउंडेशनचे सहसंस्थापक मकरंद अनासपुरे यांनी केले. ‘मेट्रो आणि मित्रो’ म्हणजे विकास नव्हे, तर पर्यावरणाचा समतोल राखत समाजाचे जीवन सुसह्य होईल, असा विकास गरजेचा आहे. त्यासाठी व्यापक चळवळ उभारायला हवी, असे ज्येष्ठ संपादक व पत्रकार संजय आवटे यांनी नमूद केले.
प्रदूषण नियंत्रण व पर्यावरण संवर्धन क्षेत्रात जगभर कार्यरत ग्रीन सोल्युशन्स संस्थेच्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात अनासपुरे बोलत होते. संस्थेच्या वतीने दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार यंदा फलटण येथील ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांना अनासपुरे व ज्येष्ठ संपादक संजय आवटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच भारत-नॉर्वे ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्योग प्रतिनिधी मंडळात निवड झाल्याबद्दल ग्रीनएक्स एन्व्हायर्नमेंटलच्या संस्थापिका आरती भोसले-अहिवळे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निवृत्त प्रादेशिक अधिकारी एल. एस. भड व निवृत्त उपप्रादेशिक अधिकारी किशोर केर्लीकर यांनाही गौरविण्यात आले.
बालेवाडी येथील हॉटेल ऑर्चिड येथे आयोजित कार्यक्रमावेळी ग्रीन सोल्युशन्सचे संस्थापक सागर अहिवळे, प्रशांत गायकवाड, अहिवळे यांच्या आई सुषमा अहिवळे, वडील चंद्रकांत अहिवळे, आरती यांचे वडील भीमराव भोसले यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. अहिवळे दाम्पत्याच्या यशाबद्दल दानोळी ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
मकरंद अनासपुरे म्हणाले, ‘‘ग्रीन सोल्युशनच्या माध्यमातून निसर्ग संवर्धनासाठी उल्लेखनीय कार्य होत आहे. आज केवळ प्रदूषण कमी करणे पुरेसे नसून, समाजातील नकारात्मकता कमी करून संवेदनशीलता आणि सामाजिक जबाबदारी वाढवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. वाढते तापमान, अनियमित पाऊस आणि पर्यावरणीय असंतुलन पाहता पर्यावरणपूरक उपक्रमांची गरज अधिक अधोरेखित झाली आहे. पर्यावरण संरक्षण ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून, सुशिक्षित समाजाने जनजागृतीसाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.”
संजय आवटे म्हणाले, ‘‘दानोळीसारख्या छोट्या गावातील मुलगी नॉर्वेसारख्या देशात जाऊन स्वतःचा आणि देशाचा झेंडा अभिमानाने फडकवते, ही ग्रामीण भागातील जिद्द, क्षमता आणि स्वप्नांच्या ताकदीची प्रेरणादायी कहाणी आहे. ग्रीन सोल्युशन ही केवळ कंपनी नसून, सामाजिक आणि पर्यावरणीय चळवळ आहे. विकासाच्या नावाखाली निसर्गावर अन्याय होत असून, जंगलतोड, प्रदूषण, पाण्याची कमतरता आणि वाढते तापमान ही गंभीर समस्या बनली आहे. खरा विकास म्हणजे सुरक्षित पर्यावरण आणि निसर्गाशी संतुलन राखणे होय.”
आरती भोसले म्हणाल्या, ‘‘माणूस कोणत्या परिस्थितीतून आला, यापेक्षा तो समाजासाठी काय निर्माण करतो, हे अधिक महत्त्वाचे असते. संघर्षातून स्वतःची ओळख निर्माण करणे, हेच खरे यश आहे. माझ्या प्रवासात वडिलांचे संस्कार आणि सागर यांची खंबीर साथ हीच माझी मोठी ताकद ठरली. छोट्या गावातून मोठी स्वप्ने पाहताना ग्रामस्थांचा पाठिंबा आणि विश्वासही प्रेरणादायी ठरला.”
सागर अहिवळे म्हणाले, ‘‘ग्रीन सोल्युशनच्या १४ वर्षांच्या प्रवासात अनेक संघर्ष, अडचणी आणि आव्हानांचा सामना केला; मात्र निसर्ग संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीच्या ध्येयापासून कधीही मागे हटलो नाही. आज ही संस्था केवळ कंपनी न राहता सामाजिक विचारधारा आणि पर्यावरणीय चळवळ बनली आहे. पर्यावरण संरक्षण आणि समाजजागृतीच्या माध्यमातून सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे.”
डॉ. प्रसाद जोशी म्हणाले, ‘‘सागर आणि आरती यांचा प्रवास अत्यंत संघर्षमय आणि प्रेरणादायी आहे. अथक परिश्रम, सातत्य आणि समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ यामुळेच त्यांनी ग्रीन सोल्युशनची यशस्वी उभारणी केली. पर्यावरण संरक्षण ही केवळ मोहिम नसून ती सामाजिक जबाबदारी आहे. लोकांना निसर्गाशी जोडण्याचे आणि सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव करून देण्याचे मोठे कार्य त्यांनी केले आहे.”
याप्रसंगी ग्रीन सोल्युशन्सच्या वतीने प्रदूषण नियंत्रण, पर्यावरण क्षेत्रात कार्यरत अधिकारी, कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. किशोर केलीॅकर यांनी मनोगत व्यक्त केले. दीपक म्हस्के व दीप्ती हलवाई यांनी सूत्रसंचालन केले. दिग्विजय राऊत यांनी स्वागत केले. प्रशांत गायकवाड यांनी आभार मानले.
Post Views: 15