मराठी

मुंबईतील जैन मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ सकल जैन संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

जैन मंदिर उद्ध्वस्त करणाऱ्या अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्याची मागणी

Spread the love

पुणे : बृहन्मुंबई महापालिकेने मुंबईतील विलेपार्ले येथील जैन मंदिर बुलडोझरच्या सहाय्याने बेकायदेशीररित्या उद्ध्वस्त केल्याच्या निषेधार्थ सकल जैन संघ,पुणे तर्फे आज (दि. 22) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. ‌

“जय बोलो महावीर की‌” , ‌”हम शांत है पर कमजोर नही‌”, ‌”मंदिर तोडा चूप नही रहेंगे, शांतीसे मार्च करेंगे‌”, ‌”हम शांतीसे चलते है, अपनी बात करते है‌’, ‌ “जय जयकार जैन धर्म की जय जयकार‌”, ‌”जैन धर्म अमर रहे‌” अशा घोषणा देत जैन समाजातील हजारो स्त्री-पुरुषांनी बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाच्या कारभाराचा निषेध केला. संबंधित अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे तसेच उद्ध्वस्त केलेल्या मंदिराचे त्याच जागेवर पुनर्निमाण व्हावे, अशा मागणीचे पत्र सकल जैन संघ, पुणेतर्फे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाने दि. 16 एप्रिल रोजी विलेपार्ले येथील जैन मंदिर चुकीच्या व बेकायदेशीर पद्धतीने पाडले. सर्व कायदेशीर बाबी समजून न घेता बृहन्मुंबई महापालिकेतर्फे अत्यंत क्रूर पद्धतीने बुलडोझर व जेसीबीच्या सहाय्याने मंदिर उद्ध्वस्त करण्यात आले. तसेच मंदिर पाडताना तेथील धार्मिक ग्रंथ, पूजा साहित्य यांची विटंबना करण्यात आली आणि मंदिरातील मूर्ती देखील भंग करण्यात आली. प्रशासनाच्या या जुलमी कार्यामुळे देशातील समस्त जैन धर्मिय व समाज अत्यंत आक्रोशित झाला आहे, असे जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. निषेधाचे निवेदन सकल जैन संघाच्या वतीने अचल जैन यांच्या हस्ते जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. या निवेदनाच्या स्वीकार करून जैन समाजाच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले.

गेल्या अनेक वर्षांपासून जैन धर्माच्या तीर्थस्थळांवर अतिक्रमण, यात्रेकरुंवर हल्ले तसेच जैन गुरू, साधू, साध्वी यांच्यावरही हल्ले असे प्रकार हेतूपूर्वक सुरू असून या मागे कोणाचा कुटील हेतू आहे याचा शोध घेणे आवश्यक आहे. याच बरोबर जैन धर्मावर, समाजावर होणाऱ्या अन्याय व अत्याचाराविरुद्ध दाद मागण्यासाठी सकल जैन संघातर्फे विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.

या आहेत मागण्या…

राज्य-देशातील सर्व जैनधर्मीय तीर्थक्षेत्रे, मंदिरे, स्थानक, उपाश्रय, साधू-साध्वींचे निवासस्थान अशा सर्व धार्मिक स्थळांवर कायमस्वरूपी सुरक्षा सुनिश्चित करणारा कायदा व्हावा, जैन धर्मिय साधू-साध्वी संतविहार करताना संपूर्ण वेळ राज्य सरकारच्यावतीने त्यांना संरक्षण देण्यात यावे, जैन धर्मियांची अत्यंत प्राचिन व हजारो वर्षांची परंपरा असलेल्या विविध तीर्थक्षेत्रांवर जसे, पालिताना, गीरनार, समद शिखरजी, राजगृही, राणकपुर तसेच अन्य ठिकाणी पूजा-भक्ती करण्यापासून विविध समाजकंटकांकडून रोखले जात आहे त्याबाबत केंद्र सरकारच्या माध्यमातून कारवाई होऊन जैन धर्मियांना संरक्षण मिळावे. मागील काही वर्षांत समाजकंटकांकडून जैन धर्मिय साधू-संतांवर वारंवार हल्ले होत आहेत. संबंधित हल्लेखोरांवर कडक कारवाई करून साधू-संतांना संरक्षण देणारा केंद्रीय स्तरावरील कायदा मंजूर करावा.

सकल जैन संघ, पुणेतर्फे अचल जैन (संयोजक) विजयकांत कोठारी, मिलिंद फडे, महावीर कटारिया यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी दहा ते १२ या वेळात धरणे आंदोनल करण्यात आले. धरणे आंदोलनात पुणे आणि परिसरातील जैन बंधू-भगिनी हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. निषेध व्यक्त करण्यासाठी काळ्या फिती बांधून आंदोलनकर्त्यांनी “हम जैन है हम रुकेंगे नही, झुकेंगे नही‌”, ‌”डरके नही, डटके खडे रहेंगे, अहिंसक है कायर नही‌” , “जैन मंदिर नही टूटने देंगे, हम अपनी आस्था बचाएंगे” , ‌”हम शांत है लेकिन कमजोर नहीं”, ‌”मंदिर पर हमला बंद करो” , ‌”बीएमसी चोर है” , ‌”जैन समुदाय को न्याय चाहिए”, “एक है तो सेफ है” , ‌”हम जैनो ने ठाना है मंदिर वही बनाना है”, ‌ “जिओ और जिने दो‌”  अशा घोषणा देत आपल्या भावना व्यक्त केल्या. आंदोलनाच्या सुरुवातीस व शेवटी नवकार महामंत्राचे सामूहिक पठण करण्यात आले. ८७ वर्षांचे सुरेश शहा यांनी आंदोलनात सहभाग घेत मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इरादा व्यक्त केला.

राजकीय पक्षातील लोकांनी अरविंद शिंदे, मोहन जोशी, प्रशांत जगताप, अभय छाजेड, अविनाश बागवे व  बाळा ओसवाल, डॉ. कल्याण गंगवाल, राजेश शहा यांनी आपले विचार व्यक्त केले.

जैन समाजबांधवांना संबोधित करताना मिलिंद फडे म्हणाले, मुंबईतील दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ सर्व समाजबांधव एकत्र झाले आहेत याचा आनंद असून ‌ “हम एक है तो सेफ है‌”  असा नारा त्यांनी दिला.

अचल जैन म्हणाले, समाजाच्या भावना मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचविणार आहोत. समाजाच्या भावनांचा जर विचार झाला नाही, न्याय मिळाला नाही तर पुढील भूमिका ठरवू.

युवराज शहा, अभय छाजेड, प्रविण चोरबेले, सुरेखा शहा, अजित पाटील, इंद्रकुमार छाजेड, प्रिती पाटील, सुरेश शहा, लक्ष्मीकांत खाबिया, सुरेंद्र गांधी, संपत जैन,सतीश शहा, समीर जैन, नितीन जैन, भरत सुराणा, ॲड. योगेश पांडे, अभय जैन, अल्पेश गोग्री  यांच्यासह विविध राजकीय पक्षांतील नेत्यांनी निषेधात्मक भावना व्यक्त करत आंदोलनाला पाठींबा दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button