आळंदी जवळील कत्तलखान्याचे आरक्षण वगळणार :- उदय सामंत
आळंदी लगत महापालिकेच्या हद्दीतील इंद्रायणी नदी लगतचे आरक्षण

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : आळंदी जवळील महापालिकेच्या हद्दी कत्तलखान्याचे आरक्षण पिंपरी चिंचवड महापालिकेने ठेवले असून ते आरक्षण आराखड्यातून वगळणार असल्याची ग्वाही राज्याचे मराठी भाषा, तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आळंदीतील धार्मिक कार्यक्रमात दिली.
ह भ प प्रमोद महाराज जगताप यांच्या षष्ठब्दीपूर्ती निमित्त आळंदीत कृतज्ञता सोहळा व गौरवग्रंथ प्रकाशनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी मार्गदर्शन करताना उद्योग मंत्री उदय सामंत बोलत होते.
या कार्यक्रमात चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या हस्ते प्रमोद महाराज जगताप यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. आनंदामोद या गौरव ग्रंथाचे प्रकाशन देखील करण्यात आले. यावेळी शांतिब्रम्ह मारुती महाराज कुरेकर, बंडातात्या महाराज कराडकर, खासदार राजाभाऊ वाजे, विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील, अक्षय महाराज भोसले, अजित वडगावकर, विलास वाघमारे, विश्वम्भर पाटील यांचेसह वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना उदय सामंत म्हणाले, प्रमोद महाराज यांच्या सत्कार सोहळ्यास हजर राहण्यास मिळाले. हे माझे परम भाग्य आहे. वारकरी संप्रदयातील मान्यवरांच्या बरोबर बसण्याचे भाग्य लाभले.
अनेक राजकीय कार्यक्रमात सत्कार स्विकारतो. मात्र वारकऱ्यांचा फेटा हा माझ्या आयुष्यातील फार महत्त्वाचा सत्कार आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी भाग्यवान आहे. वारकरी संप्रदायातील थोर गुणवंतांचा वारसा त्यांना मिळाला आहे. हिंदी, मराठी गाण्याच्या आवडी बाबत ते म्हणाले, माझ्या आयुष्यात लहानपणापासून विठुरायाची गाणी ऐकत मोठा झालो आहे. प्रल्हाद शिंदे यांची विठुरायाची सर्व गाणी म्हणू शकतो. माऊलीं कडे सर्व सामान्य माणूस जिवाभावाने येतो. या परिसरात कत्तलखाना सुरू होणार असल्या बाबत ते म्हणाले, सर्व महंतांच्या साक्षीने सांगतो. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दी मध्ये जे कत्तलखान्याचे आरक्षण दर्शविण्यात आले आहे. ते वगळणार आहे. यासाठी त्यांनी ग्वाही दिली.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यास उपयुक्त साहित्य म्हणजे ज्ञानेश्वरी. साडेसातशे वर्षा पूर्वी ज्ञानेश्वरी लिहिली गेली. ज्ञानेश्वरी संदर्भात मागणी करण्यात आली ती सर्व सामान्यांच्या हातात गेली पाहिजे. सर्व सामान्यांच्या हातात ज्ञानेश्वरी जाण्यासाठी देवस्थानने निधीची मागणी केली. मागणी प्रमाणे निधी आठ तासात मंजूर करून वर्ग करण्यात आला आहे. पालखी सोहळा वारी आंतरराष्ट्रीय दर्जाची वारी होण्यास प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शांतिब्रम्ह मारुती महाराज कुरेकर यांना पद्म पुरस्कार देण्यासाठी मागणी होत आहे. शिफारस करण्याची संधी असून निश्चित यासाठी प्रयत्न करेल असे ही त्यांनी सांगितले. माउली मंदिरात जाऊन त्यांनी श्रींचे दर्शन घेतले.