धर्मब्रेकिंग न्यूज़मराठी

ज्ञानेश्वरीची ओळख करून घेणे म्हणजे स्वतःची ओळख करून घेणे :- डॉ. सदानंदजी मोरे 

आळंदीत ओळख श्री ज्ञानेश्वरी उपक्रम शिक्षकांसाठी कार्यशाळा उत्साहात 

Spread the love

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : ज्ञानेश्वरीची ओळख करून घेणे म्हणजे स्वतःची ओळख करून घेण्यासारखे आहे. जीवन घडविण्यासाठी आणि वाचविण्यासाठी ज्ञानेश्वरीचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे प्रतिपादन संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंदजी मोरे यांनी आळंदीत केले.

श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती. ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था आणि पत्रकार संघ आळंदी यांच्या संयुक्त विद्यमाने मागील पाच वर्षा पासून ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील ज्ञान आणि संस्कार मुलांपर्यंत पोहोचावे या उदात दृष्टिकोनातून ओळख श्री ज्ञानेश्वरीची हा उपक्रम सुरू आहे. बदलत्या काळातील संस्काराचे अनन्य साधारण महत्व लक्षात घेऊन आज महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील ८८ शाळांमध्ये हा उपक्रम सुरु आहे. या उपक्रमातील अध्यापन करणाऱ्या अध्यापक अध्यापिका यांना प्रशिक्षण देण्यासाठी आळंदीत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. मोरे बोलत होते.

या प्रसंगी कार्यशाळेत दोन सत्रात मार्गदर्शन करण्यास संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंदजी मोरे, वेदांत सत्संग समितीचे वेदांताचार्य डॉ. नारायण महाराज जाधव, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे कबीर बुवा, प्रसिद्ध अर्थतज्ञ माजी विश्वस्त श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान डॉ. अभयजी टिळक, जनकाई स्वाध्याय प्रतिष्ठान आळंदीचे अध्यक्ष ह.भ.प.सुभाष महाराज गेठे, पुणे जिल्हा परिषद माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर, अध्यापक महाविद्यालय परेल मुंबईचे प्राचार्य डॉ.श्री सुरेंद्र हेरकळ, सकाळचे संपादक सम्राट फडणीस उपस्थित होते. या वेळी व्यापिठावर संयोजक श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, आवेकर भावे रामचंद्र संस्थान आळंदीचे विश्वस्त अर्जुनराव मेदनकर, ज्ञानेश्वर विद्यालयाचे प्राचार्य एस. जी. मुंगसे, सहकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच चरित्र समितीचे पदाधिकारी, अध्यापक, पुणे व जळगाव सह राज्यातील विविध शाळेतून आलेले प्रशिक्षणार्थी शिक्षक – शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. सदानंदजी मोरे म्हणाले, श्री ज्ञानेश्वरी माणसाचे जीवन घडविते. वाचविते. हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्ञानेश्वरी हा मूळ ग्रंथ आहे. वारकरी संप्रदायांमध्ये संत साहित्याचा ज्ञानेश्वरी आधारभूत ग्रंथ होता. ज्ञानेश्वरीची ओळख करून घेणे म्हणजे स्वतःची ओळख करून घेण्यासारखे आहे. वारकरी संप्रदायातील अभ्यासकां समोर प्रश्न होता की समाजाला ज्ञानेश्वरी ची ओळख करून द्यायची पण ती कशी तर त्याचे उत्तर आज मिळाले. ते या उपक्रमाच्या माध्यमातून. आज दुर्दैवाने जाती-जातीमध्ये भांडणे चालली आहेत आणि हे मिटवण्याचे काम आता कोणी करायचे? तर हा उपक्रम श्री ओळख ज्ञानेश्वरीचा त्या करता महत्त्वाचा आहे .समाजातील वारकऱ्यांची, कीर्तनकारांची ,ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणाऱ्यांची, ज्ञानेश्वरी वाचणाऱ्यांची सुद्धा ही जबाबदारी आहे. ज्ञानेश्वरी हा नागरिकत्वाची जाणीव करून देणारा ग्रंथ आहे. आता तीच जाणीव कीर्तनकार आणि वारकऱ्यांनी समाजाला करून द्यावी. कारण वारकऱ्यांचे उपरणे हे बांधिलकी आहे. ती विसरू नये. तिचे पुनर्जीवन झाले पाहिजे. सुखाचा शेवटचा टप्पा म्हणजे शांती आहे. संतांनी शांती परते सुख नाही हे सांगितलेल आहे. ज्ञानेश्वरी जगण्याचा आधार आहे. तंत्रज्ञान फार फोफावलेला आहे .त्यावर ज्ञानेश्वरी ग्रंथ फार महत्त्वाचा ठरत आहे . संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ अभय टिळक यांनी ओळख ज्ञानेश्वरी पुस्तकातील ८ ते १६ पाठांवर विचार व्यक्त करताना शालेय जीवनात मुलांना संस्कार देऊन सुसंस्कृत माणूस तयार करणे हा या उपक्रमाचा उद्देश असला पाहिजे. विज्ञान परंपरा श्रद्धा व लाभ या गोष्टीशी ज्ञानेश्वरीचा समन्वय साधून रोजच्या जगण्याशी ज्ञानेश्वरी जोडली गेली पाहिजे.असे प्रतिपादन केले.

माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ.भाऊसाहेब कारेकर यांनी ८८ शाळेमध्ये चालू असणारा उपक्रम संपूर्ण पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये सुरू करण्याच्या उद्देशाने आवश्यक ती सर्वतोपरी मदत शिक्षण विभागाकडून केली जाईल असे सांगताना ज्ञानेश्वरी हा फक्त पारायणासाठी ग्रंथ नाही, तर त्यातील ज्ञान प्रत्यक्ष जीवनात उतरणे आणि त्या नुसार आचरण करणे महत्त्वाचे असल्याचे विशद केले.

सकाळचे संपादक सम्राट फडणीस यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनातील ज्ञानेश्वरी चे महत्व विशद करताना सकाळच्या माध्यमातून या उपक्रमाला चांगले व्यासपीठ मिळवून देण्याचे मान्य करून या उपक्रमाचे कौतुक केले. प्राध्यापक हरिभक्त परायण डॉ. सुभाष गेठे यांनी ओळख ज्ञानेश्वरी तील १ ते ८ पाठांतुन पाठ कसे शिकवावे यावर मार्गदर्शन केले. प्राचार्य श्री सुरेंद्र हेरकळ सर १६ ते २४ या ओळख ज्ञानेश्वरी च्या पुस्तकातील धड्यांवर मार्गदर्शन करताना सांगितले की आपल्या प्रत्येक सणाला आणि परंपरेला वैज्ञानिक कारण आहे. अध्यात्म हे विज्ञानाच्या पुढे आहे. माणसाच्या अंगी असलेले दुर्गुण नष्ट करून परमानंदाची प्राप्ती करण्याची ताकद ज्ञानेश्वरी मध्ये आहे. अहंकार विरहित जीवन खऱ्या आनंदाची प्राप्ती करण्याचे साधन आहे हे विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून पोहोचणे गरजेचे आहे असे सांगितले. डॉ. नारायण महाराज जाधव यांनी ओळख ज्ञानेश्वरी या पुस्तकातील २४ ते ३२ या पाठांवर मार्गदर्शन केले. चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे यांनी उपक्रम माऊली आपणां सर्वांकडून करवून घेत आहेत अशी भावना व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजित वडगावकर यांनी केले. आभार चरित्र समितीचे सदस्य तुकाराम गवारी यांनी मानले. सूत्रसंचालन गणेश लिखे यांनी केले.पसायदानाने कार्यशाळेची सांगता झाली. कार्यशाळेस आलेल्या प्रत्येकाचे स्वागत तुळशी, गुलाबपुष्प आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे वैभवी मूर्तीचे दर्शनाने झाले. शिक्षकांनी माऊली मंदिरात श्रींचे पादुका पूजा, समाधी दर्शन घेत समाधान व्यक्त केले. यावेळी स्नेहभोजनाची मेजवानी देत सर्वांचे स्वागत, सन्मान देखील करण्यात आला. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी संत श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे आणि श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button